‘प्रौढ’ प्रताप पारनेर, एनजीओ कुलावतंस, राळेगण प्रतिपालक, उपोषणाधीश्वर, अण्णां ना हजारदा दंडवत.
इनंती इशेष, आपली ती परवाची पत्रकार परिषद ऐकली. ऐकून काळजाचा ठोका चुकला. म्हणून पत्राचा खटाटोप केलाय. तुम्ही बाळासाह्यबास्नी लई वंगाळ बोललात. म्हंजी कस हाय माउली, त्या रामलीला मैदानावरचा तो तुमच्यातला अचल, निश्चल सूर्य पाहिल्यावर. अख्खा देश त्या सूर्याच्या प्रकाशाने न्हाहून गेला. दहा-बारा दिवस का असेना. तुमच्यामुळ आम्हाला खरी ‘लोकशाही’ पाहायला मिळाली. माउली, तुमच्या उपोषणान त्या संसदेला नमवल. एक देशाची वज्रमूठ बनली. आणि या सरकार, प्रसासन आणि भ्रष्टाचाराबद्दल मनातील चीड, राग मोकळा करायचा मार्ग मिळाला. तुम्ही म्हटलं अगदी तसाच्या तस देशान केल. आणि म्या सुद्धा.
अण्णा रामालीलेवर तुम्ही म्हणालात की, ‘अपमान सहन करायला शिका. आपल्या ध्येयाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करा. अडचणी पाहून घाबरून जाऊ नका.’ आणि त्याहून महत्वाच म्हणजे तुम्ही स्वतः तस वागतही होता. माउली, त्यानंतर अचानक अस तुमच्यातला बदल. म्हंजी, स्वतःवरच इस्वास बसत नाही बघा. त्या लालूने लोकसभेत तुमच्या उपोशनाबद्दल शंका घेतलेली. आणि तुम्ही त्याला ‘ही ब्रम्हचर्यची ताकद आहे. दहा पोरं काढणाऱ्याला काय कळणार?’ अस उत्तर दिलेलं. त्या दिग्विजयसिंहला तुम्ही सतत ‘याला वेड्याच्या इस्पितळात पाठवा’ अस म्हणतात. आणि आता बाळासाहेबास्नी ‘साठीत बुद्धी नाठी’ अस म्हटलं. आणि पंतप्रधानाला तुमी ‘किस मु से जनता के सामने जाओगे’ अस बोललात.
म्हंजी, ही अशी वंगाळ भाषा! न्हाई इस्वास बसत. माउली ही भाषा, तुम्ही उभ केलेल आंदोलन. खर बोलायचं झाल त्या आंदोलनाला आमी आपलं आंदोलन म्हणून पाहतोय. लई अपेक्षा हाय वो तुम्हास कडन. आव ही अशी वंगाळ भाषा बोलणारे बरेच जन हायेत की. कालच ‘भ’जीत पवारने ‘भ ची भाषा आम्हालाही येते’ अस स्वतःने कबुल केल की. पण माउली, ‘भ’ ची भाषा समस्त जगतातील कुत्र्यांना येतेच की. त्यात वेगळ सांगायची गरजचं काय? आवो, जनतेचे प्रसन सोडवायला निघालेले ही संत्री लोक काय करतात हे देसाला माहिती हायेच की. म्हणून तर आम्ही तुमच्याकड पाहतोय. आणि तुमी त्यांचीच भाषा बोलायला लागला तर आमी कुणाकड जायचं?
त्यामुळे चिंता लागलीय. तुमी बगा आमच्यासाठी ‘रा-वन’ मधील ‘जी-वन’ हायेत. म्हंजी शारुख खान. पण (हात जोडून) अण्णा आम्हास्नी तुमची ‘छम्मक छल्लो’ समजू नका. माउली, तुमी लई मोठ माणूस हायेत. माझ्या सारख्या कमी बुद्धीच्या माणसाला जे मनात आल ते बोललं बगा. चूकभूल क्षमा असावी.
आपला
एक नागरिक
Leave a Reply