परवा पश्चिम बंगालमध्ये लाल भोपळ्याचे पिक गेल्याची बातमी वाचली. आणि कॉंग्रेस गवताची सुद्धा वाट लागली. काय बोलणार, उन्हाळ्यात असच होणार! पण महाराष्ट्रात मात्र कितीही कडक उन्हाळा असला तरी कॉंग्रेसच्या गवताची वाढ जोमाने आहे. दगडांच्या देशात इतका कडक उन्हाळा, आणि त्यात पाणी नाही. जिथे आहे तिथे वीज नाही. मग कुठून भाजीपाला पिकणार? बर आता भाजीपाल्यात सुद्धा कचराच जास्त असतो.
सध्याला फ़क़्त शरदांची गवार गवत काय ते चालते. कुठेही कसेही आणि काहीही आली तरी कोणी काही बोलत नाही गवारला. ‘आय’ ची असो किंवा ‘पिल’ ची असो, सगळीकडेच गवार पाणी पिते. शेवटी शरद शेतकरीपुत्र आहे. मग त्याची गवार पिकाणारच ना! गेल्या बारा वर्षांपासून तेच कॉंग्रेस गवत आणि गवार खातो आहे. आता त्याचीच सवय झाली आहे. मनातून खूप शिववडा खायची इच्छा आहे. पण येतच नाही महाराष्ट्रात. पण काहीही असो! राजाचे मनसे कसल्यामुळे भविष्यकाळात नक्की शेतीत बदल घडेल.
समाजवाद्यांचे साबुदाणे कमीत कमी मराठी खताचे मान राखतील. पण एकूणच देशात भडकलेला उन्हाळा पाहून शेतीची अजून वाट लागणार हे निश्चितच आहे. जे काही पिकते आहे. ते तर पाकी पाखरे खराब करतात. आणि त्यातूनही जे काही पिक उरते ते नक्षल रोगांना बळी पडते. आणि आम्ही नुसतचे पाहण्याचे काम करतो. तिकडे गुजरातमध्ये बाकी उन्हाळ्याची तीव्रता देखील जास्त नाही. आणि भाजीपाला देखील जोमाने आलेला आहे. हरित क्रांतीच घडून आली म्हणा. आणि पाकी पाखरे, किंवा नक्षल रोगावर प्रभावी उपाय आहेत तिकडे. अबू धाबूचे जीणे शक्यच नाही. टाटाचे उद्योग तिकडे गेल्यापासून तिकडे काहीच घाटा नाही. मोदी नावाचा मोती त्यांना मिळाला आहे. आणि आम्हाला अशोकाचे झाड.
ज्याला फळेही येत नाही आणि फुले देखील. आणि ज्याचे लाकूड देखील जाळायला उपयोगी पडत नाही. नुसतीच शोभा आहे सगळी. बाकी काही नाही. रोज उठायचे आणि नक्षल रोगांनी किती शेती बरबाद झाली याचे आकडे वाचायचे. फोरेनची पाटलीन आली आणि जिकडे बघा तिकडे कॉंग्रेसचे गवत पेरले. आणि उन्हाळा आणखीन कडक केला. त्या पाटलीनबाईला कोणी रोखायला अटल परत जन्मालाच नाही. आणि पाकी पाखरांशी लढायला कोणी जॉर्ज देखील उरला नाही. मग पाखरांचा ‘पोटा’पाण्याचा प्रश्नच राहिला नाही. लालकृष्ण होता तेव्हा त्याने गुरुला शिक्षा दिली. पण चिंटू आला आणि सगळंच लांबलं. आणि आम्ही आता आबा कसाबसा सांभाळतो आहे. आणि दिल्लीत विसरभोळ्या दीक्षितांनी गुरुला जीवाची दक्षिणाच दिली आहे. म्हणे शिक्षा दिली तर जामातील रेडे चिडतील. सोडा, एकूणच सगळा आनंदी आनंद चालू आहे.
Leave a Reply