दहीहंडी महत्वाची नाही

पुण्यात नेहमी जोरदार साजरी होणारी दहीहंडी, या वेळी मात्र स्वाइन फ्लू आल्याने ती रद्द करण्यात आली आहे. ही खरच आनंदाची बाब आहे. दोन दिवस पूर्वी येरवडा पुलाच्या बाजूला दहीहंडी कार्यक्रमाची मोठी मोठी पोस्टर लागली होती. एका पोस्टर वर तर चक्क ५ लाखाचे बक्षिस देण्यात आले होते. परंतु आज सकाळ पासून विविध मंडळ यांचे दहीहंडी रद्द अशी पोस्टर बघून बरे वाटले. दहीहंडी हा आपण खर तर मोठ्या आनंदाने साजरा करणारा उत्सव. जगात कुठेही अस घडत नाही. माणसांचे थरावर थर. आणि बघता बघता एक उंचच्या उंच असा मनोरा बनतो. एक चिमुरडा या सर्वांच्या उंच थरावर पोहचतो आणि उंच बांधलेली दह्याची हंडी फोडतो. हे सगळ अगदी उत्साह वर्धक आणि रोमहर्षक पद्धतीने होत. कधी कधी थर कमी असेल तर हंडी फोड़ता येत नाही. परंतु त्याही वेळी उत्साह तेवढाच असतो. हे सगळे गोविंदा त्याही वेळी नाचतच असतात. आणि पाहणारे आनंद लूटत असतात.

शिवसेना, मनसे यांनी त्यांच्या दहीहंड्या कार्यक्रम रद्द केले आहेत. स्वाइन फ्लू चा प्रसार होवू नये हाच एकमेव उदेश्य. परंतु असा, स्वाइन फ्लू आजार आणखिन किती बळी घेइल काही सांगता येत नाही. आपले मनमोहन सिंह, काही स्वाइन फ्लू मधे लक्ष घालायला तयार नाही. त्याना अजुनही देशाची प्रगति चालू आहे असेच वाटते. सध्याला पुण्यातील १० माणसे मृत्युमुखी पडलेली आहेत. आणि मुख्य गोष्ट अशी की आपणही सरकारवर का अवलंबून रहायचे? ज्या सरकारला एका तासात २०० माणसे मारले गेल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण याची चिंता असेल. अस सरकार १०- २० माणसे मारली गेल्यावर कधी पाहणार. हजारापेक्षा अधिक शेताकर्यानी आत्महत्या केल्या तरी देखील आपला देश समृद्ध म्हणणारे सरकार आपल्याला काय वाचवणार? त्यासाठी आपल्या जीवाची चिंता आपणच केलेले बरे. म्हणजे मी तरी माझ्या पद्धतीने स्वत ची काळजी घेतो.

दहीहंडी खर तर खुप छान उत्सव. परंतु सद्ध्याच्या वातावरणाने त्यावरही प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. या परिस्थितीत आपला जीव महत्वाचा. हे संकट गेल्यावर पुढच्या वर्षी अधिक उत्साहाने दहीहंडी साजरी करता येइल. परंतु माझ अस म्हणण नाही की, दहीहंडी साजरी केली तर काही चुक होईल. साध्या पद्धतीने देखील साजरी केली जावू शकते. साजरी करावी का नको हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तो निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. परंतु मला तरी असे वाटते की, सद्याची परिस्थिती पहाता आपण स्वत च्या तब्येती कड़े जास्त लक्ष द्यायला हवे.

Leave a Reply