सकाळी मोबाईलची रिंग वाजली. आजकाल रिंग वाजली तरच सुट्टीच्या दिवशी जाग येते. नाहीतर सूर्यदेव डोक्यावर आल्यावर माझी पहाट होते. आवरून बँकेच्या कामासाठी बँकेत गेलो. तिथे दारातच एक भीमरूपी फोनवर बोलत उभा. कसाबसा बँकेत शिरलो. चेक भरण्याची स्लीप भरत असतांना एकजण फोनवर अकाऊंट नंबर घेत होता. बर, पैसे जमा करायचे एका बँकेत आणि हा पठ्या आला दुसऱ्या बँकेत. बर झालं स्लीप भरल्यावर निदान मला विचारलं. नाहीतर चेक ड्रॉपबॉक्स टाकल्यावर विचारले असते तर जाम पंचाईत झाली असते. काय हुशार लोक असतात.
बर माझ बँकेतील काम झाल्यावर निघालो तर म्हटलं एका इन्शुरन्सच्या कंपनीतील एक राहिलेले काम उरकून टाकू. तिथे बाहेर चोवीस तासाची त्यांच्या हेल्पलाईनचा नंबर. आत गेलो तर शनिवार आणि रविवार सुट्टी असते असे कळले. म्हणजे आज सुट्टी. मग काय करणार, म्हटलं वेळ आहेच तर ‘सोलर’ एजन्सीत जावून चौकशी करूयात. उन फारचं वाढल आहे. एजन्सीत पोहोचलो. तिथे असलेल्या मुलीला सोलर यंत्रांबाबत माहिती विचारली. तिला काही पूर्ण माहिती सांगता येईना. मग तिने तीच्या ‘सरांचा’ मोबाईल नंबर दिला. त्यांना फोन केल्यावर नीट काय ते माहिती कळली. गावाकडे विजेचा प्रश्न बाराही महिने असतो. कधीही जा वीजच नाही. म्हटलं एखादे ‘सोलर’ विजेचे यंत्र खरेदी करावे. दोन-तीन दिवे आणि एखादा पंखा चालेल अशी व्यवस्था करू. असो, सोलर उपकरणे खुपंच महाग आहेत. पण मी घेईल.
तिथून निघाल्यावर वडिलांना मोबाईलवर उपकरणांची माहिती दिली. यार पुण्यातील मुली! घरी जातांना एका मंदिराच्या बाजूला एका हिरोने त्याच्या हिरोईनला सोडलं. तो जाऊन अर्धा मिनिट झाला नसेल तेवढ्यात तिने आपला फोन दुसऱ्या हिरोला फिरवला. काय खरं नाही. कोण कोणाला फिरवत काय कळत नाही. असो! घरापर्यंत पोहोचेपर्यंत याच विषयावर विचार करत होतो. वर्तमानपत्र चाळायला सुरवात केली. त्यात बातम्या कमी आणि मोबाईलच्या जाहिरातीच जास्त. जेवायला बसलो तर सहज टीव्हीवर काय पाहाव म्हटलं तर तिथेही तेच. ‘फ्रेंड क्लब’ च्या नावावर वर्तमानपत्रात मोबाईल नंबर देऊन जाहिराती देतात. आणि लोक जाहिरातील नंबरवर फोन करून त्यांच्या फसवणुकीला कसे बळी पडतात ते दाखवत होते. संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचा उद्या ये असा फोन आला. ठीक आहे म्हटलं.
असो, मोबाईल अशी गोष्ट झाली की जवळ ठेवावीच लागते. त्या इन्शुरन्स कंपनीची आज सुट्टी. पण फोन केलातर ते उपलब्ध. प्रत्यक्ष जाऊन काय फायदा झाला नाही. त्या सोलर एजन्सीमध्ये देखील तेच झालं. सकाळी उठण्यापासून संध्याकाळपर्यंत मोबाईलने कुठेच पाठ सोडली नाही. खरं बोलायचं झालं तर आपण मोबाईलचे गुलाम होत आहोत का याची शंका येते. असो, फायद्याचीच गोष्ट आहे. पण आपण खरंच अनेक गोष्टी आपल्यापासून दूर होत आहेत. सोडा तो विषय. आज महात्मा फुलेंची जयंती आहे. १८४८ साली पहिली मुलींची शाळा आमच्या पुण्यात सुरु झाली होती. एक खूप मोठा आणि चांगला इतिहास निर्माण झाला होता. आणि १९४७मध्ये आम्ही तुकड्यांचा इतिहास केला. किती मोठा फरक आहे ना महात्मांमध्ये. बाकी बोलूच.
Leave a Reply