खरच बरोबर आहे. माझ्या नुसत्या बडबडीला काय अर्थ आहे? काल माझ्या एका नोंदीला आलेल्या प्रतिक्रियेत हेच होते. प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे. मी ज्या सरकारला नाव ठेवत आहे. तेच मुळात काहीही न करू शकणार आहे. शंभर कोटी प्रेतांच्या देशात अजून काय घडू शकते? पुण्यात बॉम्बस्फोट होणार हे ह्या नंदी बैल मुख्यमंत्र्याला आणि त्याच्या पोलिसी कुत्र्यांना माहिती होती. तरी देखील.. सोडा परत मी त्यांच्यावर सुरु झालो. ते काहीच करू शकत नाही. चार माणसांच्या बदल्यात इस्राईलने पेलेस्टांइनच्या राष्ट्रपतीला त्याच्या राजभवनात रणगाडे घालून त्याला ठार मारणारे आपण नाही आहोत. जर सरकार आपल्या लोकांना असच मरू देणार असेल आणि आपल्याच जीवावर स्वतः कायद्याचे उल्लंघन करणार असेल तर आपण का कायदे पाळायचे? या वेळेपासून मी सरकारचा कर भरणार नाही.
आता माझ्या काही हजारांनी तसा काहीच फरक पडणार नाही. पण जर ते माझ्या लोकाच्या जीवाची हमी देणार नसतील तर मी देखील का त्यांचे नियम पाळण्याची हमी द्यायची? तिकडे बॉम्बस्फोट झाला आणि आमच्या इथे ही राजकारणी स्वतः ची वाढदिवसाचे फ्लेक्स चौकाचौकात लावून ठेवले आहेत. दहा किमीच्या रस्त्यात नऊ भले मोठे फ्लेक्स. जर माझ्या कराच्या पैश्यात खड्ड्यांचे रस्ते होणार असतील, ह्या महानगरपालिकेतील नगरसेवकांना लैपटॉप देणार आहेत. आधी ब्लेकबेरी आणि आता लैपटॉप. छान चालल आहे. हे असले प्रस्ताव चर्चा न करता मंजूर होतात. याच महिन्यात उत्तरप्रदेश मधील आमदारांचे पगार साठ टक्यांनी वाढवले. कोणत्याही पक्षाने विरोध केला नाही. खासदार निधी कोटीत आहे. आणि पगार लाखाचा चौथा हिस्सा. तरीही भ्रष्टाचार करतातच. आणि आपण मात्र नियमित कर भरायचा.
ती राष्ट्रपती राष्ट्रपती भवनाच साध वीज बिल भरत नाही. आणि आपण नियमित कर भरायचा. मतदानासाठी गावी जायचा खर्च आपल्या खिशातून करायचा. आणि मिळणार काय तर बॉम्बस्फोट. पोलीस काय त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा कोणालाही अडवून लायसन्स दाखव. हेलमेट का नाही घातलं? असल्या कोणत्याही कारणाने पैसे उकळणार. आणि हे आपल्याच कराच्या पैश्यातून पगार घेणार. असो, माझे फार काही नाही पण कर रुपाने तीस हजार देत असतो. घर घेतले आहे. ते आईच्या नावाने घेतले आहे. त्यामुळे तो खर्च मी माझ्या खर्चात दाखवू शकत नाही. त्याची पाणीपट्टी आणि घरपट्टी अस मिळून दहा हजार. असा जवळपास चाळीस हजार मी सरकारला दान करतो. दानाच म्हणायला हव. कारण परत मिळत नाही ते. ‘राष्ट्र’ म्हणजे देव आणि हे लुंगी आणि पगडीवाले त्याचे पुजारी. मी ती रक्कम कशी वाचवायची हे मला माहिती आहे. माझ हे चुकीचे आहे. मला अस बिलकुल म्हणायचं नाही की माझ्यामुळेच देश चालतो. पण काय करणार, माझ्या पैश्यातून जर कसाब पोसला जात असेल तर, आणि अशोक चव्हाण आणि त्याचे पोलीस दल लोक मारल्या गेल्यावर काहीच करणार नसेल तर मला त्या पापात सहभागी व्हायचं नाही. मी ते पैसे माझ्यासाठी वापरणार नाही.
आपल्या इथे अशा खूप मराठी शाळा आहेत की, त्यांची अवस्था फारच खराब आहे. अनेक ठिकाणी पाणी पिण्याच्या सोयी नाही. अनेक अनाथ आश्रम आहेत. त्यांनाही अनेक अडचणी आहेत. साध नुसत एक फेरफटका मारला तर आपल्याला हजार अडचणी आणि त्रासात असलेल्या गोष्टी दिसतील. मग त्यांच्यावरच तो पैसा खर्च केला तरी देशाशी गद्दारी होणार नाही. सरकारला कर भरायचा आणि एक वर्ष झाल तरी साध रेशनकार्ड द्यायला टाळाटाळ करत असतील. तर मग कर देऊन काय अर्थ आहे? आणि काल मी राष्ट्रपतीबाईला तीच्या संकेतस्थळावर जाऊन एक प्रतिक्रिया नोंदवली आहे. तस आता मी कोणाकडूनच काही अपेक्षा करीत नसतो. पण नुसती बडबड काय उपयोगाची?
Leave a Reply