वजन हा गेल्या काही दिवसांपासून खुपंच जिव्हाळ्याचा विषय होऊन गेला आहे. खर तर पोटाचा वाढता ‘नगारा’ हा त्याहून अधिक जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पण सध्यातरी वजनावरच बोलू. आता वजन किती असावं यावर चर्चा करायला फार काही महान नाही. पण साधारणपणे जितके इंच उंची, तितके किलो वजन असायला हवं, अस वडील नेहमी बोलतात. तेवढे असेल तर सुधृढ. कमी असेल तर लुकडा, आणि जास्त असेल तर जाड. आता माझी उंची पाच फुट पाच इंच (१६५ सेंटीमीटर) आहे. तसा हिशोब पकडला तर माझे वजन साधारणपणे ६५ किलो हवे. दोन महिन्यांपूर्वी कंपनीत शारीरिक परीक्षण होते. त्यावेळी माझे वजन ७२.५ किलो भरलेले. खर तर आनंद झालेला. कारण त्याआधी एक महिन्यांपूर्वी पर्यंत माझे वजन ७५ किलो होते. खरंच मी खुपंच ‘वजनदार’ झालेलो आहे.
तीन वर्षांपूर्वी मुंबईला होतो त्यावेळी वजन ५८ किलोच्या आसपास होते. पण तिथून पुण्याला आल्यावर काही हालचालच नाही. म्हणजे कंपनी आणि घर यापलीकडे काहीच नाही. काकाकडे राहायला होतो. त्यामुळे जेवण घरीच. मग तब्येत ‘सुधारणार’च ना. दीड वर्षात खुपंच ‘सुधारलो’. कळलंच नाही की, वजनाने पंच्यातरी कधी गाठली. माझी मैत्रीण आणि माझी लहान बहिण माझ्या वाढत्या आकारमानबद्दल मला सांगायचे. पण मी कधी मनावर घेतलंच नाही. नंतर नंतर माझी मैत्रीण माझी ‘जाड्या’ वगैरे म्हणून मस्करी करायची. पण तरीही काहीच वाटत नसायचे. उलट अस मस्करी मस्करीत तिचेही आकारमान कधी वाढल हे तिलाही लक्षात आले नाही. पण तिने ताबडतोप मेनटेन देखील केले. या कंपनीत आलो, त्यावेळेसही मला वजन आणि आकारमान बद्दल काहीच वाटत नव्हते. परंतु ‘अप्सरा आली’. आणि सगळंच बदललं. माझा नेहमी नियमितपणे अनियमित होणारा व्यायाम, नियमितरीत्या सुरु झाला. पण तरीही काहीच फरक पडेना. ना तब्येत कमी होईना, आणि न सुधरेना. काय कळत नव्हते.
मी सकाळी उठून धावायला देखील जात होतो. पण त्यानेही काही फरक पडेना. नंतर नंतर खाणेपिणे कमी करून पहिले, तरीही फरक काहीच नाही. आई गावी गेल्यावर तर अजूनच आकारमान वाढू लागले. वजन वाढत नव्हते. पण कमी सुद्धा होत नव्हते. खाण्यात बाहेरचे पदार्थ एकदम बंदच करून पहिले. पण तरीही काही फरक पडेना. आकारमान आहे तेवढेच. गेल्या एक महिन्यापासून व्यायाम वाढवला. पण तरीही तेच. आणि गेल्या दोन आठवड्यापासून ती जुन्याच कॅन्टीनमध्ये जेवते. एक आठवडा तीच्या शिवाय जेवण करून पहिले. खर बोलायचे झाले तर जेवायची इच्छाच होत नसायची. म्हणून शेवटी वैतागून, मागील आठवडा त्या जुन्या ‘बंडल’ कॅन्टीनमध्ये ज्यूस आणि फ्रूट प्लेटवर काढला. कारण तिथले जेवण पाहून जेवायची इच्छाच मारून टाकावी लागते. काय करणार, ते जेवण इतके छान की, काही विचारायचीच सोय नाही. काल, मित्रांसोबत असंच टाईमपास करीत होतो. वजन काटा पाहिल्यावर, वजन करावे म्हटले.
खर तर जेवण झाल्यावर वजन करायला गेलेलो. वजन पहिले तर विश्वासच बसेना. आज खात्री म्हणून कंपनी मधील वजन काट्यावर पुन्हा एकदा चेक करणार आहे. वजन चक्क ६८ किलो झाले आहे. मस्त! तीन महिन्यात सात किलो कमी झाले. आणि या तीन महिने आधीपर्यंत गेले दीड वर्ष तो वजन काट्याचा काटा माझ्यावर ‘काटा’ धरून होता. पंचाहत्तरीच्या पुढेही जात नसायचा आणि खालीही येत नसायचा. आता नेमक कशामुळे कमी झाले हे सांगणे देखील अवघड आहे. कारण तीन महिन्यात मी वजनाचा विचारापेक्षा जास्त अप्सराचा विचार केला. व्यायाम करीत आहे. परंतु सध्याला जेवणाचे ‘आबाळ’ चालू असल्याने कमी केला आहे. आता हा परिणाम नेमका कशाचा म्हणजे माझ्या उपायांचा की अप्सराच्या कृपा प्रसादाने झालेल्या उपासाचा, हे नक्की सांगता येणार नाही. पण काहीही असो, आज खूप आनंद होतो आहे.
Leave a Reply