आंधळे आणि पांगळे

एका गावात दोन मित्र रहात असतात. एकाचे आडनाव आंधळे. आणि दुसऱ्याचे आडनाव पांगळे. आंधळे शाळेत हुशार असतो, तर पांगळेला अभ्यासात बिलकुल रसच नसतो. दिवसभर मारामाऱ्या आणि भांडणात त्याचा दिवस जात असतो. अस असून देखील दोघांची दोस्ती पक्की. हळहळू दोघेही मोठे होतात. आंधळे वकिलीचे शिक्षणासाठी मोठ्या शहरात निघून जातो. पांगळे राजकारणात पडतो. इकडे आंधळे शिक्षण पूर्ण करून वकील बनतो. तर तिकडे पांगळे आमदार बनतो. बऱ्याच वर्षांनी दोघेही आपआपल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहचतात.

सगळे सुखासुखी चालू असतांना शेजारील देश आक्रमण करतो. अचानक झालेल्या हल्ल्याने अनेक निष्पाप लोक मारले जातात. परंतु सैनिकांच्या शौर्यामुळे हल्ला करणारे मारले जातात. व त्यातील एक शत्रूसैनिक जीवंत पकडला जातो. हल्ल्याची तीव्रता एवढी असते की, या घटनेने सारा देश हळहळतो. आणि चिडून उठतो. सारा देश शेजारील देश नष्ट करण्याच्या गोष्टी बोलू लागतो. सरकारला उत्तर विचारले जाऊ लागते. त्यावेळी पांगळ्याचे सरकार असते. पांगळे इतकी वर्ष निवडणूक सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार केलेला नसतो. या घटनेने तो गोंधळून जातो. मग त्याला आंधळ्याची आठवण येते. आंधळे आणि पांगळे दोघेही भेटतात.

दोघेही एकामेकांना बघून चकित होतात. दोघातही खूप मोठा बदल घडला असतो. आंधळे जाडजूड चष्मा लागलेला असतो. तर पांगळे आपला पांढऱ्या कपड्यात नगारा लपवलेला असतो. दोघेही एकमेकांना भेटल्यावर इतिहासात हरखून जातात. पांगळे या भेटीने उत्साही होतो. घरी आल्यावर शत्रू राष्ट्राला ‘कडक’ भाषेत पत्र लिहितो. इकडे रीतीनुसार खटला चालू होतो. योगायोगाने या खटला आंधळेच्या अखत्यारीत येतो. अख्या देशाने पाहिलेला हल्ला आंधळ्याला त्याच्या जाडजूड चष्म्यामुळे दिसलेला नसतो. सहाशेपेक्षा अधिक साक्षीदार आणि सीसीटीव्हीचे फुटेज बघून देखील आंधळे निर्णय देत नसतो.

एक एक दिवस जात असतो. तिकडे शत्रू सैनिक रोज रोज नवीन वाद निर्माण करीत असतो. त्याचे रोजच्या मागण्या वाढत जात असतात. कधी बिर्याणी तर कधी उर्दू वर्तमानपत्र. काय करणार इकडे पांगळे सरकार त्याच शत्रू सैनिकांच्या धर्माच्या लोकांच्या मतावर निवडून आलेले असते. त्यामुळे त्या शत्रू सैनिकाचे लाड पुरवण्यावाचून काही उपायच नसतो. तब्बल दोन वर्षांनी आंधळ्याला शत्रू सैनिकाने देशाविरुद्ध हल्ला केल्याचे पटते. आणि आंधळे शत्रुसैनिकाला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावते. शिक्षा ठोठावताच शत्रूसैनिकापेक्षा जास्त चिंता पांगळ्याच्या सरकारला. कारण शिक्षेची अंमलबजावणी करायला गेल्यास सरकार पडेल याची भीती वाटत असते. मग ते टाळण्यासाठी पांगळे सरकार आमच्याकडे जल्लाद नाही, अजून त्याची फाशी वेटिंगमध्ये आहे अशी कारणे द्यायला लागते.

स्वतःच शिक्षेच्या अंमलबजावणीतून पळवाटा काढायला सुरवात करते. लोक काय समजायचे ते समजून जातात. आता या आंधळे आणि पांगळेची पुढची गोष्ट रोज तुम्ही पहातच आहात.

Leave a Reply