आळसले

परवा एका मोठ्या मल्टी नेशनल कंपनीत मुलाखतीसाठी गेलो होतो. कंपनीत जत्राच भरली होती. मी ज्या पदासाठी मुलाखत द्यायला गेलो होतो, त्याच पदासाठी जवळपास तीन अंकी उमेदवार आलेले. बघून वाटल आत्ताच मागे फिरावं. पण थांबलो. माझ्या कंपनीतील काम आणि कंपनी दोन्हीही छान आहेत. पण आपण किती पाण्यात आहोत याची परीक्षा आपण स्वतः घेऊन उपयोग नसतो. त्याकरिता दुसऱ्याने तपासावे लागते. मुलाखत हा एकदम उत्तम मार्ग आहे. कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास गेलो होतो. माझी मुलाखत दुपारी अडीचच्या सुमारास सुरु झाली. तोपर्यंत इतर उमेदवारांनाची तोंड बघण्या वाचून दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. मुलाखत तीन पद्धतीत होणार होती. पहिला माझ्या कामाविषयी प्रशोनात्तर पद्धतीने, दुसरी पद्धत लेखी आणि तिसरी प्रक्टिकल. नेहमी माझा प्रश्नोत्तरात म्हणजे पहिल्याच पद्धतीत बोंब असते. कारण माझ इंग्लिश फारच सुमार. त्यामुळे मला प्रश्न कळतो पण उत्तर नीट आणि दुसऱ्याला समजेल अशा  भाषेत सांगता येत नाहीत. यावेळी पहिला राउंड सुरु होण्याआधी थोडी धाकधूक होती. पण प्रत्यक्ष मुलाखतीत माझा युवराज झाला होता. त्याने जवळपास तीस प्रश्न विचारले असतील. मोजून दोन सोडली तर इतर प्रश्न माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक उत्तम आणि अचूक आली होती.

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मला वीस प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यातही बारा प्रश्नांची उत्तरे माझ्या अगदीच परिचयाची असल्याने लेखी फारच सोपी झाली. दोन राउंडनंतर माझ्यावरच आत्मविश्वास खूपच दुणावून गेला होता. संध्याकाळी पाच वाजता माझी शेवटची आणि महत्वाची प्रक्टिकल म्हणजेच ऑनलाईन  टेस्ट झाली. खर तर हाच माझा सर्वात ताकदीचा मुद्दा आहे, मला दिलेले काम मी हव तसं करून मी दाखवू शकतो. वेळ दोन तासाची होती. पण दिलेले काम मी दोन तासात करू नाही शकलो. त्यानंतर जे वाटले, त्यावरून पराभवानंतर अडवाणीला आणि उद्धवाला काय वाटले असेल याची कल्पना आली. अजूनही मनात ती सल आहे.  घरी येताना खूप विचार केला, की अस घडलंच कस. मग आता काळात आहे. मागील जवळपास सहा महिन्यांपासून माझ कामात लक्ष नाही. मागील सहा महिन्यात मी ‘ती’ आणि इतर गोष्टीत खूपच लक्ष घातल्याने. माझ्या कामाकडे आणि वेगाकडे दुर्लक्ष झाले. ज्ञान आणि तलवार ह्या दोन्ही गोष्टी सारख्या असतात. वापरल्या नाही तर गंजतात. धारही कमी होते. माझी तलवार आत्तापर्यंत मनाच्या कोपऱ्यातील अडगळीच्या खोलीत पडली होती. असो, प्रत्येक गोष्टीत आळस शिरला होता.

कंपनी आणि तिथून घर हाच दिवसाचा साचा बनला होता. मध्यंतरी म्हणजे दिवाळीत तर कहरच झाला. रोजची देवाची स्तोत्र म्हणण आणि थोडा फार व्यायाम दोन्हीही बंद झाली. एवढंच काय पण ब्लॉगवर येण देखील बंद झाल होत. बहुतेक आता मी पुण्याच्या पठडीतला होत चाललो आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण आणि झोप हाच दिनक्रम. सहा महिन्यात नवीन एकही गोष्ट शिकण्यात रस घेतला नाही. सहा महिन्याआधी मी काही कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. दिलेल्या सर्व मुलाखती अगदी उत्तम रीतीने गेल्या. पण कंपन्या कंजूष. भाजीपाल्याचे भाव करतात तसे पेमेंटच्या बाबतीत करू पाहत होते. पण यावेळच्या मुलाखतीने झोपच उडवून टाकली आहे. या सहा महिन्यात तलवारीला घासून पुसून धार आणावीच लागेल. मी माझ नेहमी सहा महिन्यानंतर माझ्या स्वतःच्या कलेची परीक्षा करून घेत असतो. स्किल ह्यावरच स्केल अवलंबून असत. स्किल वाढवा की स्केल देखील आपोआप वाढतो. रात्री सात वाजता त्या कंपनीतून निघालो. आता माझा आत्तापर्यंतचा अनुभव आणि मुलाखतीचे पहिले दोन राउंड बघितले तर माझी निवड होऊ शकते. पण तिसऱ्या राउंडचा विचार करता शक्य वाटत नाही. मागील दोन दिवसापासून  माझा मलाच राग येतो आहे. कधी कधी वाटत माझ आडनाव आठल्ये बदलून आळसले ठेवाव.

Leave a Reply