उपास

सकाळी नाष्ट्याला जातांना एका मित्राने आज संकष्टी आहे अस सांगितलं. झालं! मी आज उपास करणार अशी घोषणा मित्रांमध्ये करून टाकली. आजकाल मी कुठलाच काही विचार न करता निर्णय घेतो अस आजच्या निर्णयावरून कळायला अख्खा दिवस गेला. घोषणा केल्या केल्या मित्रांनी जणू काही फार मोठा विनोद सांगितल्यावर हसावं तस हसायला सुरवात केली. एका मित्राने तर, तुझा पापाचा घडा भरून वाहतोय. उपास केल्याने काही फरक पडणार नाही. असा शेरा देखील मारून टाकला. दुसऱ्याने तर, उपास केल्याने मुली भेटत नसतात अस देखील म्हणाला. तरीही माझा निर्णय ठाम ठेवला. आणि कॅन्टीनमध्ये शिरलो.

उपासाच काय आहे का ते बघावं म्हटलं तर काहीच नाही. बाकी मागाल ते तिथे होते. सामोसे, ढोकळा, पोहे, उपमा, भजी, इडली, डोसा. सर्दीमुळे वास तर येत नव्हता. पण सकाळी काहीच खाल्लेले नव्हते. आणि असे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटायला लागले. मग कसाबसा मनावर ताबा ठेवला. आणि तिथल्या एका कॅन्टीनमधील माणसाला ‘खिचडी आहे का?’ अस विचारले. तर तो नेहमीप्रमाणे ‘नाही’ असे उत्तर दिले. बाजूच्या फळ्यावर काही उपासाचे आहे का ते शोधण्यात बराच वेळ गेला. पण दुध आणि फ्रूट प्लेट सोडून काही उपासाला चालणारे काहीच नव्हते. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागल्यावर दुध घेऊन मोकळा झालो. बाकी मित्रांसोबत बसल्यावर या माझ्या उपासाच्या निर्णय का घेतला अस विचारू लागले.

काय करणार मागील संकष्टीच्या वेळी बहिणाबाईने असाच काही कामानिमित्ताने मला फोन केला होता. त्यावेळी बोलता बोलता तिने आज उपास केलास ना अस विचारले. मी उपास करतच नाही असा कळल्यावर ज्या कारणासाठी फोन केला ते सोडून अर्धा तास चिंचवडमध्ये राहून तू उपास करीत नाही. यावरून प्रवचन दिले. झालं म्हणून आज ‘संकष्टी’ आहे अस कळल्यावर ताबडतोप ‘उपासाचा’ निर्णय घेतला अस मित्रांना सांगितले. तरीही म्हणतात ना ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे’. तस ह्यावरून सुद्धा विनोद चालूच. त्या ग्लासभर दुधाने काय माझ पोट भरणार होते. शेवटी दुपारी काहीतरी मिळेल या आशेने तिथून निघालो. एक तर सर्दी, त्यामुळे आधीच डोक जाम दुखत होते. आणि त्यात आणखी उपास, माझ्या अंगात ताकद नसल्याप्रमाणे वाटत होते. पाण्याच्या एक सोडून दोन बाटल्या संपवल्या. पण भूक काही मिटेना.

आज कसं काम केल हे मलाच माहित. दुपारी पुन्हा कॅन्टीनमध्ये गेल्यावर पुन्हा ‘खिचडीचा’ शोध सुरु केला. पण परत निराशा पदरी आली. चौकशी केल्यावर फक्त अंगारकीलाच खिचडी बनवली जाते असे उत्तर मिळाले. मग, ती फ्रूट प्लेट. बऱ्यापैकी फळे होती. पण त्यातही पोट भरले नाही. दुपारी काय करू आणि काय नको असे झाले होते. सर्वजण मस्तपैकी भाज्या आणि लज्जत पदार्थांचा स्वाद घेत होते. आणि मी आपला त्यांची तोंड पहात बसलो होतो. त्यात माझ्या एका मित्राला त्याची डबा खायची इच्छा होत नव्हती. मग काय तो मला ‘डबा संपवतोस का?’ अस विचारात होता. त्याची बटाट्याची भाजी आणि पोळी पाहून मन विचलित होत होते. एकदा तर खड्ड्यात गेला उपास असा विचार मनात आला होता. एका मित्राने ‘गुलाबजाम’ आणले होते. पाहून मनावरील ताबा कुठल्याकुठे गेला होता. त्यातच ते पराठे. ते सर्व पाहतांना कॅटरिना कॅफचे ‘किस मी..’ गाणे आहे ना. तस ते पदार्थ मला सुद्धा ‘किस मी..’ म्हणत असल्याचा सारखा भास होत होता. जाम भूक वाढली होती. पण उपास ना.

यार या उपासाचा शोध का लागला कुणास ठाऊक. मग शेवटी तसाच उठून माझ्या डेस्कवर आलो. काम झाल्यावर फारच भूक आणि थकवा जाणवत होता. रात्री काकाकडे जाऊन बसलो तर चंद्रोदय दहाच्या पुढे. मग पुन्हा कसाबसा ताबा ठेवला. असो, रात्री जेवतांना जाम स्वर्गसुखाचा आनंद मिळत होता. साधी पोळी देखील गोड लागत होती. मस्त झालं जेवण. त्यात रात्री माझे भाऊ बहिण, मी आणि माझी मैत्रीण असे चौघे रात्री आईस्क्रीम खाल्ले. असो, खाल्ल्यावर मला सर्दी आणि खोकला असल्याचे लक्षात आले. होत अस कधी कधी. पण हा उपास जाम हॉरिबल होता. दिवस संपला हे नशीबच म्हणायचं. सकाळी दिवस कधी संपतो आहे अस झाले होते. पुढच्या उपासाला आधीच तयार राहायचे ठरवले आहे.

Leave a Reply