एका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत.
तसं दुसऱ्या जंगलातून आलेले कुत्री, रान मांजर, बैल, लांडगे, डुकरे सर्व वाघावर दात खाऊन असायची. एके दिवशी तो वाघ खूप आजारी पडला. ते पाहून सगळ जंगल चिंताग्रस्त झाले. वाघ पुन्हा ठीक व्हावा म्हणून प्राण्यांनी देवाकडे प्रार्थना केली. परंतु, तो एके दिवशी मेला. त्याच्या जाण्याने जंगलातील सर्वच प्राण्यांना दु:ख झाले. दुःखाची तीव्रता इतकी होती की, न कोणी घराबाहेर पडले, न कोणी आपला व्यवसाय केला. थोडक्यात जंगल त्या दिवशी पूर्णपणे ‘बंद’ होते. हे पाहून बाहेरच्या जंगलातून आलेल्या एका मांजरीला राग आला.
मग काय तिने डायरेक्ट, वाघाच्या फेसबुकच्या पानावरच ओरखडे ओढले. हे पाहून अजून दुसऱ्या मांजरीने ‘म्याव’ केले. आधीच दु:खी झालेले जंगालातील प्राणी हे पाहून जाम भडकले. ते प्रकरण इतके चिघळले की, त्यातील काही प्राण्यांनी तिच्या भावाच्या म्हणजे हिरव्या सापाच्या दवाखान्यावर हल्ला केला. तिथल्या पिलावळीला चोप दिला. नाईलाजास्तव प्रकरण अजून जास्त चिघळू नये म्हणून शेवटी जंगलातील पोलिसांनी त्या दोन्ही मांजरीला ताब्यात घेतले. हे पाहताच त्या पोलिसांचा डॉबरमेन उर्फ त्यांचा मुख्य पोलीस अधिकाऱ्याने साध्या उंदराच्या जामीनीवर तिची सुटका केली. आणि त्या सापाच्या दवाखान्यावर हल्ला करणाऱ्या दु:खी प्राण्यांना अटक केली. कारण डॉबरमेन देखील बाहेरील जंगलातला. मग काय बाहेरच्या जंगलातील ‘भेडीयांनी’ या प्रकरणाचे लचके तोडायला सुरवात केली. का कोण जाणे, हे सगळ पाहून जंगलातील सामान्य प्राणी, वाघाच्या पुरागमनाची वाट पाहू लागले.
Leave a Reply