कोणाला निवडावे? चित्रपटाची सुरवात एका गोड कार्यक्रमाने होते. नायक घरी पोहचतो. नायकाला नायकाच्या वडिलांनी मुलीचे वडील येणार हे सांगण्यात आलेले असते. घरी पोहोचताच, तो मुलीच्या वडिलांसोबत आलेल्या मुलीला आणि इतर नातेवाईकांना पाहून तो चकित होतो. आयुष्यातील त्याचा ‘पाहण्याचा’ पहिला कार्यक्रम असतो.
तो थोडा घाबरलेला, थोडा टेन्शन आणि खूप आनंदात असतो. तो मुलीला आणि ती मुलगी देखील त्याला पाहण्याचा आणि पाहून टाळण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असते. दोघांच्या आई वडील गप्पात रंगलेले असतात. मुलगा मुलीच्या भावाशी अर्थ नसलेल्या विषयावर गप्पा मारीत असतो. पण तो मुलीचा भाऊ मुलीपेक्षाही जास्त लाजत असतो. थोड्या वेळाने मुलाला मुलीसोबत बोलण्यासाठी वेळ दिला जातो. मुलगा मुलीला आणि मुलगी मुलाला आवडलेले असतात. परंतु, अस असून देखील दोघेही एकमेकांना ती गोष्ट लपवित असतात. दोघांचे आई वडील लग्नाच्या संदर्भात निर्णयासाठी वेळ देतात. निर्णय होतो. कोणाला निवडावे ऐवजी निवड झालेली असते.
दोघांचाही होकार एकमेकांना कळविला जातो. ‘बोलणी’ करण्याचा दिवस ठरतो. ठरलेल्या दिवशी सकाळी मुलाच्या वडिलांना मुलीच्या आईचा फोन येतो. मुलाचे वडील ‘ठीक आहे’ अस म्हणून फोन ठेवतात. संध्याकाळी नायक घरी आल्यावर त्याला ‘नकार’ कळविल्याची बातमी कळते. नायक ‘शॉक’ होतो. नेमक काय घडल हेच त्याला उमजत नाही. तो उदास होतो. आता ‘लग्न’च नको अशी त्याची धारणा होते. नायकाला ती मुलगी मनापासून आवडलेली असते. नायकाची मोठी बहिण त्याची समजूत काढते. नायक थोडा सावरला जातो. त्या मुलीचा विषय डोक्यातून काढून टाकतो.
परंतु, अचानक एके दिवशी मुलीची आई नायकाच्या घरी येऊन त्याच्या आईला भेटून आमचा ‘होकार’ आहे अस सांगते. ते पाहून नायकाच्या घरातील सर्वजण गोंधळात पडतात. नायक आनंदी होण्यापेक्षा जास्त गोंधळून जातो. मुलीला भेटायची इच्छा प्रकट करतो. मुलीची भेट होते. मुलगी तिच्या आईला एका गुरुजींनी ‘म्हातारपणी त्या दोघांना त्रास होईल’ अस सांगितले होते. म्हणून नकार आईने कळवल्याचे सांगते. नायक त्या मुलीला तिचे मत विचारतो. ती मुलगी थोडी लाजत, थोडी हसत आणि खूप आनंदात त्याला होकार असल्याचे सांगते. ती हेही सांगते की, तिने घरी नायाकाशीच लग्न करण्याचा ‘हट्ट’ केल्याने होकार करावा लागल्याचे सांगते. नायक ते ऐकून आनंदित होतो. ‘बोलणी’चा दिवस ठरतो. सगळ व्यवस्थित चालू असते. परंतु देव नावाच्या चित्रपटाच्या ‘डायरेक्टर’ला सर्व सुखासुखी चाललेली ‘कथा’ चालू द्यायची नसते. मुलीची आई ‘रजिष्टर’ लग्न करण्यासाठी हट्ट करते. नायकाच्या घरच्यांना रजिष्टर लग्नाचा प्रस्ताव मान्य नसतो. आणि शेवटी व्हायचे तेच होते.
इकडे नायक आणि तिकडे ती मुलगी नाराज होतात. नायक नशीब म्हणून या गोष्टी विसरण्याचे ठरवतो. त्याला त्यावेळी त्याची मैत्रीण त्यासाठी मदत करते. पण मैत्रिणीच्या मनातील ‘भाव’ त्याला खूप उशिरा लक्षात येतात. त्यानंतर काही महिन्यांनी दुसरे ‘स्थळ’ नायकासाठी चालून येते. मुलगा त्या मुलीला पाहण्याच्या कार्यक्रमासाठी जातो. मुलीशी बोलतो. बोलण्यातून ती मुलगी शिक्षण आणि तिच्या करियरबद्दल सिरीयस असल्याचे कळते. तिच्या शिक्षणानंतर तिला लग्नासंदर्भात विचार असल्याचे सांगते. परंतु तिच्या आई वडिलांच्या दबावापुढे ती झुकल्याचे नायकाला समजते. नायक तिला विश्वासात घेतो. मुलीच्या घरच्यांना ‘नकार’ कळवतो.
नायक अशा मुलीचा विचार करीत असतो. जी फक्त त्यासाठी असेल. त्याला ती ‘नायिका’ हवी असते. आणि अचानक एके दिवशी त्याला एक अशी मुलगी दिसते की, तो कसा कधी तिच्यात वाहून जातो हे त्यालाही कळत नाही. तिचाच ‘विचार’. तीच सर्वकाही. तो तिच्यात बुडून जातो. त्याला हवी असलेली नायिका त्याला मिळाली असा त्याचा समज होतो. अजून एका स्थळाचा कार्यक्रम ठरतो. मुलगी छान असते. परंतु, हा तिच्यातही ती त्याला वाटलेली ‘नायिका’ दिसत असते. तो ‘नकार’ देतो. आई वडील त्याला ‘नकार’ची कारणे विचारतात. त्याच्या डोक्यातील ते ‘बूम’ त्याला काहीच करू देत नसते. स्थळ येत असतात. त्या सुंदर मुली पाहतांना त्याला त्याची नायिका दिसत असते. तो तडफडत असतो. तिला पाहून, तिच्यासोबत दुसर्याला पाहून हसतांना जळत असतो. एके दिवशी तो तिला मनातल सांगतो. ती त्याला तिचा ‘नकार’ सांगते. नायक खचतो. अस का घडल्याची कारणे शोधतो. परंतु कारणे काही मिळत नाहीत.
इकडे नायकाचे आई वडील त्याच्या लग्न विषयाने नायकाला खूप सतावत असतात. नायक त्यांना ते जे ठरवतील त्याला होकार देईल अस सांगतो. त्याचे आई वडील खुश होतात. परंतु हा ‘अस का घडल?’ या प्रश्नाने उद्विग्न असतो. प्रश्न त्याला सतावतो. माझ काय चुकल? म्हणून मला ही शिक्षा मिळाली?. आणि ध्यानी मनी स्वप्नी त्याला वाटलेली नायिकेचे आ’भास’ त्याला अधिकच गोंधळून टाकत असतात. नायकाच्या आई वडिलांमध्ये कोणते ‘स्थळ’ होकार द्यावा यावरून एकवाक्यता होत नसते. नायकाच्या वडिलांना एक स्थळ योग्य वाटत असते. तर नायकाच्या आईला दुसरेच. नायकाला मुळात लग्न या विषयात रस राहिलेला नसतो. त्यात त्याचे नातेवाईक एकापेक्षा एक स्थळ आणून गोंधळात अजूनच भर टाकीत असतात. त्याच्या मित्रांच्या बहिणींची स्थळाबद्दल त्याला विचारणा होवू लागते. त्याने असा कधीच विचार केलेला नसतो. शेवटी एका स्थळाबद्दल तो होकार देऊन तो मोकळा होतो. ती मुलगी देखील ताबडतोप होकार कळवते. नायक सुटकेचा नि:श्वास सोडतो. कोणाला निवडावे हा प्रश्न सुटतो.
परंतु, त्या ‘डायरेक्टर’ला ते मान्य नसते. ऐके दिवशी नायकाला आलेले पहिले स्थळ. ती मुलगी त्याला दिसते. तिचा तो उदास चेहरा पाहून नायक विचारात पडतो . तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनातील विचार तो समजून जातो. तिच्यासाठी तो ‘नायक’ असतो. तिने तो हट्ट अजून सोडलेला नसतो. नायकला पाहून ती सुरवातीला खुश आणि नंतर एकदमच पडक्या चेहऱ्याने काहीच न बोलता निघून जाते. नायकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळते. पुढे दोन एक दिवसात, नायकाला अजून एक स्थळाचा प्रस्ताव येतो नायक इच्छा नसतांना, केवळ आई वडिलांच्या इच्छेखातर तिला पहायला जातो.
ती मुलगी, ती एकदम दिलखुलास. हसतांना बोलते की, बोलतांना हसते. तिचा रूप. तिचे सौंदर्य पाहून नायक गडबडतो. तिचा स्वभाव एकदम नायकासारखा. बोलण्याची पद्धत, लबक अगदी मनात येणारे विचारही. नायक गोंधळतो. नायक ‘शब्द’ पाळणारा. दिलेला शब्द म्हणजे वचन. परंतु, त्याच्या मनात पुन्हा एकदा त्याची ‘नायिका’ ही तर नाही ना असा विचार डोकावू लागतो. निर्णय कोणता घ्यावा ते समजत नसते. पुन्हा एकदा मन आणि मेंदू एकमेकांसमोर उभे ठाकतात. कोणाला निवडावे ह्यावर द्वंद सुरु होते. कोणत्याही निर्णयापर्यंत तो पोहचू शकत नाही. आणि नायक गोंधळात पडतो.. नायकाने ‘काय करावे?’ जोडीदार म्हणून कोणाला निवडावे?
Leave a Reply