आता कशी सुरवात करावी हेच कळत नाही. मागील एका महिन्यापासून एक गोष्ट मला सारखी खटकत आहे. काय करावं तेच कळत नाही. मला ना आजकाल जी मुलगी दिसेल ती आवडते. बर इथपर्यंत ठीक आहे. पण दुसरी पहिल्या मुलीपेक्षा सुंदर दिसली मग ती आवडते. म्हणजे दर पाच दहा मिनिटांनी दुसरी. ‘ती’चा विषय कसा बसा कमी झाला आहे. ‘ती’च्या विचारांनी आधी डोक दुखवल, आता ह्या गोष्टींनी डोक पकल आहे. दुसरे कसले विचारच येत नाहीत मनात. नेहमी वाटत कोणी तरी असावी की जी फ़क़्त माझीच असावी. आणि तीलाही मीच असावा. जीला बघितलं की दुसऱ्या कोणत्या मुलीचे विचार मनात डोकाऊ देखील नये. आणि तीने मला बघितलं की तीच्याही मनात माझाच विचार यावा. म्हणजे रंगाने फार गोरी असली पाहिजे अशी काही किंवा फार काळी हवी अस काही नाही. फ़क़्त तिच्यावर विश्वास ठेवता यावा.
मग जी मुलगी दिसते तिच्यात मी नेहमी मला हवी ती शोधतो. आणि अस दररोज घडत. हे विचारही जात नाहीत. आणि तशी कोणी भेटतही नाही. घरातून कंपनीत जाताना. आणि तिथून निघून घरी येताना. हाच एक विचार मनात येत असतो. पण ज्यावेळी एखाद्या जोडप्याला पाहतो त्यावेळी मात्र ‘ती’ची आठवण येते. मग माझा मलाच राग येतो. अस वाटत की मी खूप चूक केली, उशीर केला. नंतर मला मीच खराब वाटतो. मग अस वाटत की कोणी भेटणारच नाही मला, मला हवी तशी. की जी माझी आणि माझीच असेल. जीला माझ्या शिवाय दुसरा कोणी आवडणार नाही. जी माझ्या करिता वाट्टेल ते करायला तयार असेल. जीला मी सोडून दुसरं तिसरं काही सुचणार नाही. आणि ती बघितल्यावर मलाही करमणार नाही. म्हणजे मला याआधी कोणी मैत्रिणी नव्हत्या अस काही नव्हत. आणि मला त्यांच्याकडे बघून काही वाटलंच नाही, अस देखील नाही. पण जी आवडायची तीला एक तर हजार मित्र असायचे. नाहीतर तिचा आधीच कोणीतरी एखादा हिरो असायचा. काही होत्या पण त्यांना बघून असल्या असण्यापेक्षा नसलेल्या बऱ्या असं वाटायचं. म्हणून मी कधीच त्यांच्याबद्दल विचार केला नाही. बर माझ अस देखील नाही, की कोणी नव्हतंच. खूप मैत्रिणी झाल्या. अजूनही आहेत.
आजकाल हे येणारे विचार टाळण्यासाठी मी कोणी मुलगी दिसली की मान खाली घालतो. ती गेल्यावर समोर बघतो. बर दर वेळेस अस नाही होत. काही काही तर इतक्या छान छान वाटतात की बघतच रहाव अस वाटत. इतरांच्या गर्लफ्रेंड बघून मलाही एखादी असावी अस वाटत. माझ्या अनेक मित्रांना गर्लफ्रेंड आहेत. आणि तेच मित्र मला सल्ला देतात की गर्लफ्रेंड नसलेली चांगल. का विचारलं की ते म्हणतात ‘खूप टेन्शन असते’. माझा एक मित्र नेहमी गर्लफ्रेंड म्हणजे ‘वेस्टेज ऑफ टाईम एंड मनी’ असं म्हणतो. खर तर मला कोणी विचारलं तर मी त्याला ‘गर्लफ्रेंड लाईक वडापाव एंड वाईफ लाईक राईस प्लेट’ असं म्हणायचो. पण आता खूप इच्छा होत आहे. कोणी तरी असावी असं नेहमी वाटत. पण माझ्या वक्रतुंड महाकाय मूर्तीकडे बघून कोण रिस्क घेईल? म्हणजे मला मी आरश्या समोर उभा राहून मी पसंत आहे का अस विचारलं तर मी देखील ‘नाही’ असाच म्हणेन.
आता सुट्टीच्या दिवशी मी घराबाहेर देखील जात नाही. विचार येऊ नयेत म्हणून. उगाच मी बाहेर निघणार आणि कोणी तरी छानशी मुलगी पहिली की तिच्या बद्दल मनात विचार सुरु होणार. बर नुसतं घरात बसून रहाव म्हटलं किंवा झोपावं म्हटलं की स्वप्नात देखील तेच. बर आजकाल कोणाबद्दल ही विचार येतात. म्हणजे माझा फ़क़्त मुलींच्याबद्दल असं म्हणायचं आहे. आजदेखील दुपारी मला तिच्या लहान बहिणीबद्दल स्वप्न पडलं. तिची लहान बहिण टी.वाय ला आहे. बर एखाद दोन वेळा ठीक आहे. पण दुसरा विचारच मनात येत नाही. कधी कधी वाटत लग्न हा एक उपाय आहे. पण त्यात चुकल किंवा एरर आला की अंडू किंवा नवीन प्रोग्राम नाही ना करता येत. आजकाल वर्तमापत्रात आणि गावातील लग्नानंतर होणारी लफडी बघून त्याची देखील भीती वाटते. अगदी खर सांगायचं झाल तर मला मुलींची भीती वाटते. की जर एखादी अशी मुलगी मला भेटली तर माझी तर विकेटच गुल. पण हे विचारही संपत नाहीत. काल आईने पुन्हा आपलं लग्न पुराण मला ऐकवले. मलाच मुलगी शोध म्हणाली. आई सुद्धा ना एक महान आहे. आज शेजारचे बाहेर गेले होते. त्यांच्या आत्या बाई आल्या होत्या. मी त्यांना पाणी पिण्यासाठी दिलं तर ‘तू ब्याचलर आहेस का?’ असं विचारलं. आता मनात असं आल होत की त्यांना म्हणाव ‘कशाला जखमेवर मीठ चोळत आहेत?’
Leave a Reply