जेव्हा अडचणी येत असतात. आणि तुम्ही त्याच्याशी दोन हात करता. त्यावेळी काही वेळासाठी तुम्ही संपला असं तुम्हाला/आजूबाजूच्या लोकांना वाटत असते. काहीदा अडचणी येतच राहतात. काही काळ तुम्हाला गुंतवून ठेवतो. एक अडचण संपली की दुसरी. असे चक्र चालू राहते. पण माझ्या स्वानुभवरून तरी जेव्हा खूपच कठीण काळ येतो त्यावेळी समजून जा की चांगला काळ जवळ आलाय.
मी अनेकदा अनुभवलंय. अडचण/प्रश्न निर्माण होतो. व कालांतराने तो सुटतो. मग आपण काहीसे सुखावतो. तेवढ्यात दुसरी अडचण येते. पुन्हा तेच चक्र फिरू लागते. सततच्या गोष्टीने माणसाचा त्रागा होतो. आजूबाजूचे सहकारी आपल्याला चुकांचा मूर्तिमंत पुतळा समजू लागतात. काय माहित प्रत्येक गोष्ट चुकीची असे वाटू लागते. आणि मग चिंता सुरु!
माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर आधीही अशा अडचणी आलेल्या. काही काळासाठी मी कोसळलो. अगदी सगळेच प्रत्येक गोष्टीत मला दोषी धरायचे. त्यावेळी काहीच नको असं झालेलं. पण नंतर तो काळ सरला. अनेक प्रश्न चुटकी सरशी सुटत गेले. मला दोषी म्हणणारे माझे उदाहरण देऊ लागले. सगळ्यांनाच माझा अभिमान वाटू लागला.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. काही काळासाठी तुम्हाला परिस्थिती अगदी नालायक ठरवून टाकते. लोकांना तुम्ही मूर्ख वाटू लागता. थट्टेचा विषय बनून जाता. गरज असते मनावर/स्वतःवर ताबा ठेवण्याची. रामानेही चौदा वर्षांचा असाच वनवास भोगला. काळ सरतो इतके नक्की!
स्वतःवर ताबा व विश्वास ठेवला तर काळ बदलायला फार काळ लागत नाही. मी पुन्हा तसाच काहीसा काळ अनुभवतोय. पण मागील अनुभवरून यावेळी मी मागील वेळेपेक्षा सकारात्मक व आत्मविश्वास अधिक आहे. जर आपणही अशाच काळातून जात असाल तर स्वतःला एकटे समजू नका! मीही सोबत आहे.
Leave a Reply