खर तर खूप गोंधळलो होतो. निवड कोणाची करावे हेच कळत नव्हते. पण, निर्णय घेतला आहे. खर तर मागील महिन्याच्या म्हणजे १३ फेब्रुवारीला मी माझा ‘होकार’ एका स्थळाला कळवला. आणि त्या मुलीनेही १४ फेब्रुवारीला तिचा होकार कळवला आहे. हाहा! काय बोलू यार मी? तिला माझ्याबद्दल काय माहिती आहे देव जाणे. आणि मी तर तिला एकच प्रश्न विचारलेला. नुसत्या तीस मिनिटांच्या बेसवर हा निर्णय घेतला आहे.
पण मध्यंतरी काही घडामोडी घडल्या. त्यामुळे, वेळ गेला. असो. या शनिवारी मला वडिलांनी गावी बोलावलं आहे. तिचे आई वडील, कदाचित तीही येईल. बहुतेक ‘बोलणी’ कधी करायचे ते ठरवले जाईल. आठ महिन्यांपूर्वी! म्हणजे तिसरा अध्याय! सोडा, मी पण काय बडबडतो आहे. जुलैमध्ये पाहण्याचा कार्यक्रम झालेला. मला माहिती आहे मी निवड करायला खूप जास्त वेळ घेतला. पण प्रॉब्लेम माझ्यात होता. मीच वेगळ्या विश्वात गेलेलो. असो, जेव्हापासून मी होकार दिला आहे तेव्हापासून घरात आनंदच वातावरण आहे. मातोश्री आणि पिताश्रींनी ‘लग्न’ विषयाला आता थोडाफार का असेना पण ‘विराम’ दिलेला आहे.
गेला महिनाभर मित्र आणि मैत्रिणींनी इतक्या टिप्स दिल्या आहेत ना! की ‘सुखी जीवन’ या विषयावर मी एखादे पुस्तक नक्कीच लिहू शकतो. अजून कशात काही नाही. परंतु, काकू तिचे नाव बदलून काय ठेवायचे यावर विचार करते आहे. कारण तिचे नाव आणि माझ्या छोट्या बहिणीचे नाव एकच आहे. एकूणच, मजेत चालू आहे. माझा बॉस ही आत्ता थोड्यावेळापुर्वी कॉन्फरन्स कॉलमध्ये बोलतांना ‘उदाहरण’ म्हणून ‘हेमंतचे लग्न ठरले’ अस मुद्दाम सारख सारख म्हणत होता. आणि ते ऐकून माझे हसू देखील रोखले जात नव्हते. पीएमला अजून काही माहित नाही. तो आपला बिचारा गोंधळलेला.
असो, अजून बहिणाबाईला ही बातमी सांगितलेली नाही. तिला सुगावा लागलेला. पण मी, अजून काही नक्की नाही म्हणून टाळले. खर बोलायचे झाले तर, तिच्याशी बोलतांना आजकाल खूप बेकार वाटते. आणि तिच्याशी बोलायचे मी आजकाल टाळतो. म्हणजे फक्त तीच नाही सगळेच नातेवाईक! त्यांच्याशी या विषयावर बोलायची इच्छा होत नाही. भाऊ, बहिणी, नातेवाईकही खूप छान आहेत. आणि मातोश्री पिताश्री तर देवासारखे. असे आई वडील असायला नक्कीच भाग्य असावे लागते. मला भीती या गोष्टीची आहे की, ज्या पद्धतीचे नातेसंबंध माझे आणि माझ्या भाऊ बहिणीचे आहेत. जे नातेसंबंध माझे नातेवाईकांशी आहेत. ते लग्नानंतर बिघडणार तर नाहीत ना. कारण मला तिच्याबद्दल ती एम.सी.एच्या दुसऱ्या वर्षाला आहे, हे सोडून बाकी काहीच माहित नाही.
माझी अशी खूप इच्छा होती की, जी कोणी माझी असेल तिला माझ्याबद्दल सर्व काही माहित असेल. आणि मलाही तिच्याबद्दल. हे जाम टिपिकल ‘अरेंज मॅरेज’ होते आहे. माझ्या मित्र मैत्रिणी मला तिचा फोटो दाखव म्हणत होत्या. फोटोच काय तिचा ‘स्वभाव’ देखील माहित नाही. असो, तिची रास धनु आहे. आणि तिच्या कुंडलीवरून तिचा स्वभाव मला तरी थोडा ‘एककल्ली’ वाटतो. मी तिला पाहण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी ‘तू लग्नानंतर एम.सी.ए कस करशील?’ म्हणजे सध्याला ती सोलापूरला असते म्हणून मी विचारलेलं. त्यावेळी तिने ‘मी मायग्रेशन सर्टिफिकेट आणून करू शकते’ अस उत्तर दिलेलं. एकूणच वागण्यात ती ठीक वाटलेली. अड्जस्ट होईल अस वाटलेलं. बाकीच्या स्थळात या एका गोष्टीची कमतरता मला जाणवलेली. दिसायला देखील चांगली आहे. पण माझ्यासोबत असल्यावर मी जास्त गोरा वाटेल. हेमंत आठल्येचा ‘पार्ट वन’ संपायची वेळ आली आहे. माहित नाही भविष्यकाळ काय असेल. पण मला माझ्या निर्णय क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. बाकी बोलूच..
Leave a Reply