परवा म्हणे दरबार भरला होता. मलिका ए हिंदोस्तान बडी बेगम त्यावेळी रयतेवर चिडल्या. ‘काय लावलाय महागाई आणि कर वाढ? कधी बघावे त्यावरच रयतेच रडण आपल चालूच. काय दुसरा धंदा आहे की नाही?’ सगळे सरदार जमा झाले होते. प्रत्येकाने आपआपले अर्ज दरबारात सादर केले. आता बाकी काही नाही ना म्हणून अर्ज. मग बडी बेगमने त्यांच्या शुद्ध आणि स्पष्ट भाषेत सगळ्यांना आदेश दिला की जा आणि माझ्या रयतेला सांगा की ‘हे सगळ कोणासाठी चालल आहे?’ एकाने मध्येच ‘पंजासाठी’. मग मलिका ए हिंदोस्ता आणखीन भडकल्या ‘अरे फुलांनो, आम रयतेसाठी चालल आहे’. अस म्हटल्यावर सगळ्या सरदारांनी मान डोलावून होकार दिला. पुढे बडी बेगम म्हणाल्या ‘आम्ही काय नाही केल? बॉम्बस्फोट काय असतो. कसा असतो. कधी बघितला होता काय? आम्ही तुम्हाला ‘होम डिलीव्हरी’ दिली. अतिरेकी कसा असतो. हे कधी उघड्या डोळयांनी पाहिलं होत का? त्याचा चेहरा कधी पहिला होता का? बघा आमच कसब.’
‘आता मागील आठवड्यात दिदींनी दिल ना बरंच काही. मग आता ‘दा’ घेणार ना. रयतेला एवढ साध कस कळत नाही. आणि आमच्या कोगलाई मध्ये असेच होणार. कोगलाई रयतेसाठी किती मेहनतीने काम करत आहे. आणि अजूनही खूप कामे बाकी आहेत. त्याच्यासाठी खजिना हवा. आणि तोच तर आम्ही भरतो आहोत. बघा अजून दोन वर्षांनी म्हणाल की २०१० ला किती स्वस्ताई होती. आणि तसंही आता आमच्या राज्याला कशाचाच धोका नाही आहे. कुणीही आमच काहीच वाकड करू शकत नाही. ‘दा’ चे उपकार माना. जेवढी कर वाढ केली आहे. ती पुढच्या अर्थसंकल्पाच्या मानाने खुपंच कमी आहे. आम रयतेच्या विकासाच्या योजनांचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यात अन्न धान्याचे भाव यावर आमचा होरा असेल. आता इतकी स्वस्ताई असून देखील आम्ही कठोर आणि कडक निर्णय घेऊन स्वस्ताई अजूनही स्वस्त केली. आणि असे केले नसते रयतेच्या आठवणीत आम्ही कसे घर करून राहणार?’ अस म्हटल्यावर सगळ्या सरदारांनी एकच घोष केला ‘सुभान सल्ला’.
मलिका ए हिंदोस्तान सगळ्यांना खामोश करत म्हणाल्या ‘आमच्या जहागिरदारांना मी फर्मान सोडते की साठेबाजांवर कारवाई करा.’ ‘आणि रयतेला म्हणावं जरा कळ काढा. अजून पन्नास हजार शेतकरी मेले तरी काय फरक पडत नाही. मुळात ते करच भरत नाहीत. आणि म्हणून त्यांकडून आम्हाला काय फायदा नाही. वाहनांना लागणारे इंधन दरवाढ मागे घेणे सोडाच, पण जे देते ते निमुटपणे घ्या.’ एक सरदार लुंगी सावरत म्हणाला ‘मेरे हुजूर, माझी एक विनंती आहे. आपल्या राज्यात आजकाल रोजच कुठे ना कुठे गिलानीच्या फौजा हल्ले करीत आहे.’ बडी बेगम हास्य करत ‘मग तुम्हाला काय त्रास आहे? तुम्ही सगळ्यांना रयतेला शांत राहायचा सल्ला द्या. बाकीच आपल्या चंगेझ सिंगवर सोडा.’ दुसरा सरदार उठला ‘हुजूर, तिकडे चीनी च काय करायचं?’ बेगम म्हणाल्या ‘थांबा आणि वाट पहा.’ आणखीन एक सरदार ‘आपल महिला रक्षणाच काय?’ हे ऐकताच मलिका ए हिंदोस्ता वैतागून म्हणाल्या ‘अरे फुला, महिला आरक्षणाची काम आपण करायची, रक्षणाची नाही. रक्षणाच ते त्याचं बघून घेतील’.
पुढचा सरदार ‘मॉम, आता मी काय करू?’ मलिका ए हिंदोस्ता खुपंच लडिवाळपणे म्हणाल्या ‘माय स्वीटहार्ट, तुझ्या लग्नाच बघ आधी. तू मुंबईत गेला होतास ना? मग कोणी पहिली का नाही?’ सरदार लाजत बोलला ‘मॉम, आम्ही नाही जा…’ सगळीकडे हास्याचा कल्लोळ पसरला. बडी बेगमने मोठ्या आवाजात ‘खामोश, आपण दरबारात आहोत. थोडी तरी लाज बाळगा. रयतेला वाटायला हवं आपण गंभीर पणे काम करीत आहोत. नाही तर..’ सगळे सरदार कान टवकारून ऐकायला लागले. बडी बेगामांनी थोडा श्वास घेतला आणि म्हणाल्या ‘माझा बोलण्याचा पुढचा कागद कुठे गेला रे???’
Leave a Reply