बोललो पण

दुपारी बोललो पण, खूप डब्बा. म्हणजे मला नीटसे ‘हाय’ देखील म्हणता आले नाही. पण बोललो. तीच्या डेस्कपर्यंत मी सिंहासारखा होतो. आणि तीच्या समोर उंदरासारखा. घसा सुरवातीला बोलल्यापेक्षा अधिक कोरडा पडला होता. कशी बशी हिम्मत करून बोललो. तिला ‘हाय’ केल्यावर ‘जेवण झालं का?’ अस विचारले. ती ‘हो’ म्हणाल्यावर, तिने माझ्या जेवणाबद्दल विचारलं, खर तर जेवण आधीच झालेलं होत माझ. पण तीच्या समोर काहीच सुचेना. मग तिला म्हटलं ‘त्यासाठीच चाललो आहे’. आणि तिथून सटकलो. पण यावेळी खर सांगू का मन खरंच नाही भरले. ती बोलतांना इतकी छान हसते ना, की अजून बोलाव अस वाटत रहाते. पण तिच्यासमोर गेलो की, काहीच सुचत नाही. ती खूप छान आहे. नुसते पहातच राहण्याची इच्छा होते. पण तीच्या समोर, सगळ शौर्य फूस!

एकदा खरंच वाटल होते, माझा ब्लॉग तिला आहे अस सांगाव, पण मनाला ते मान्यच होत नाही. मी आत्ता हिम्मत नाही करू शकलो. आणि माझ्या इच्छेसाठी अस दुसऱ्याची मदत घ्यायला सुरवात केली तर, पुढील आयुष्यात तर असे रोज कसा तोंड देणार? मी जसा आहे, हे तिला तीच्या पद्धतीने आणि तीच्या विचारांनी कळावे हीच सदिच्छा. हा ब्लॉग म्हणजे माझ मन आहे. आणि जर तिला कळून गेल की माझ्या मनात काय चालू आहे. तर ती आत्ता जशी वागते आहे तशी वागणार नाही. कदाचित तिला मी आवडेल. पण, मग ती नेमकी कशी हे देखील मला कसं कळणार? आज ती एकाशी बोलत होती. त्यावेळी मला तीचा खूप राग आला होता. जो बोलत होता ना, त्याच्या तोंडावरूनच त्याची काय इच्छा आहे हे दिसत होते. तिला का कळत नाहीत या गोष्टी? पण पुन्हा तिला हसतांना बघितलं की, राग पळून जातो. तिच्याशी बोलतांना तीचा तो चेहरा! ती खूप छान दिसते. मला फक्त तीच हवी हवीशी वाटते.

परवा, आधी म्हटलं ना ‘परी’ वाहिनी . त्या माझ्याशी स्वतःहून बोलल्या. आज जेवण झाल्यावर दिसल्या सुद्धा. पण मीच बघून न बघितल्या प्रमाणे केले. एक ‘ताई’ आहेत संध्याकाळच्या बसला. आता चांगली आहे. पण मी तिला ‘ताई’च म्हणणार. मला न्याहाळत असतात. खरंच, अप्सरा सोडून काही दुसरे सुचतच नाही. तिची आठवण इतकी येते ना! आणि मग डोके दुखायला लागते. आज संध्याकाळीच मी (रड)गाण्याचा तासाभराचा कार्यक्रम केला. हे आता मुलीच्या वरती होते आहे. पण काय करू, दुसरे तिसरे विचारच मनात येत नाहीत. तिच्याशी बोलून कॅन्टीनमध्ये मित्रांशी बोलायला म्हणून गेलो. तर त्यांचे भलतेच. ते माझी चेष्टा करीत होते. त्याच काही इतकं वाटल नाही. पण त्यातला एक मला ‘ब्लॉगला विषय’ म्हणून हे सगळ करतो, अस म्हणाला. त्यांची मते ऐकून खूप वाईट वाटले. दोघांच्याही मते, ती मला कधीच भेटणे शक्य नाही. कारण ती बी.ई झालेली आहे. आणि मी बारावी नंतर साधा डिप्लोमाचा कोर्स.

मला हे देखील मान्य आहे की, मी शिक्षणात खूप मागे राहिलो. सगळे मला याच विषयावर नावे ठेवतात. अगदी आई वडील सुद्धा. पण, आज मी ज्या बी.ई लोकांसोबत काम करतो त्यांना किती ‘कला’ आहे हे मी खुपदा अनुभवलं आहे. ते हुशार नाहीत मी अस म्हणतच नाही. पण आपण जे काम करतो. ते व्यवस्थित करू शकलो तर.. सोडा, मला ह्यात काहीच नाही म्हणायचे. मी आहे असं आहे. बाकी, तिची इच्छा. पण मला ती खरंच खूप मनापासून आवडते. उद्यापासून त्या मित्रांना ‘जय महाराष्ट्र’ आणि ती मिळणार नसेल तर ‘ब्लॉग’ला. असो, आज बोललो पण समाधान नाही झालं. उद्या सकाळी नाश्त्याला तिची पुन्हा एकदा वाट पाहिलं. आजकाल मी माझ्याच आवाक्याच्या बाहेर जातो आहे. खूप मनात होत बोलावं. म्हणून पुन्हा बोललो. त्रासाबद्दल क्षमा मागतो.

Leave a Reply