लग्ना आधीच जीवन आणि लग्नानंतर होणारा जीवनातील बदल, यातील सुखी कोणते वगैरे गोष्टी कदाचित वादाचा विषय होवू शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर यात फरक असतो. जर फरक पडलेला नसेल. तर मग ‘अवघड’ आहे.
लग्नाआधीचे जीवन म्हणजे एखाद्या त्यागी योग्याप्रमाणे असते. किंवा एखाद्या गिर्यारोहकाला पर्वताच्या शिखराची जशी ओढ लागलेली असते. त्याप्रमाणे लग्नाआधी जोडीदार व्यक्तिमत्व कसे असेल? ती व्यक्ती कोण याचा अखंड न थकता मनात विचार आणि शोध चालू असतो. ज्यांना अशी व्यक्ती मिळालेली आहे. त्यांना पाहून कायम मनात आपल्याला आपली योग्य व्यक्ती कधी मिळणार?, अस म्हणून जीवन बेचैन असते.
प्रत्येक वेळी दिसेल त्या व्यक्तीत त्या ‘योग्य’ व्यक्तीची झलक आपण शोधात असतो. काहींना मिळते. काहींना मिळून न मिळाल्याप्रमाणे असते. नेहमी एकांताच्या क्षणी, ती ‘योग्य व्यक्ती माझ्यासोबत असती तर’चे विचार वगैरे. थोडक्यात, ‘अतृप्त’. लग्नानंतर मात्र बरेच काही बदलते. तुम्ही म्हणजे तुम्ही एकटे नसता. सोबत ती ‘योग्य’ व्यक्ती. आणि जबाबदारी. म्हणजे त्या व्यक्तीचीच अस नाही.. सर्वांचीच. नाही हो म्हणता नवीन तयार झालेले नातेसंबंध. प्रत्येकाच्या प्रेमळ अपेक्षा.
सुरवातीला सगळ सुरस असते. अगदी स्वर्गच अवतरलेले असते. चोहोबाजूंनी ‘कोडकौतुक’ होत असते. हव्या त्या गोष्टी मिळत असतात. सगळ छानपैकी चालू असते. खरा संसार त्यापुढे सुरु होणार असतो. म्हणजे दोघांचे तिघे झाल्यावर. खर सांगायचे झाले तर, मुले झाल्यावर जबाबदारीची जाणीव होते. आई वडील झाल्यावर आपल्या आई वडिलांची किंमत खऱ्याखुऱ्या अर्थाने त्यावेळी कळते. मग घरातील रोज उभ्या ठाकणाऱ्या अडीअडचणी. मग त्यातून मार्ग काढतांना निर्माण होणारे कलह. नातेसंबंधातील वितुष्ट. सगळ हळूहळू डोके वर काढू लागते.
मग स्वातंत्र्याची उणीव आणि जबाबदारीची जाणीव होवू लागते. स्पष्ट शब्दात सांगायचे झाले, तर ‘हॅंगओवर’ होतो. जोडीदार व्यक्तीच्या सवयी, आचार विचार यातील फरक हे ‘ठळकपणे’ जाणवू लागतात. मग खरी कसरत त्यावेळी असते. जोडीदार हा ‘योग्य’ की ‘अयोग्य’ असा विचार त्यावेळी निव्वळ अविचार असतो. यातून जो मार्ग काढतो. तो तरतो. नाहीतर, भूतकाळात रममाण होणारे आपण सर्वत्र पाहतोच.
माझ्या मते तरी, लग्नाआधी जे आहे त्याची आपल्याला जाणीव नसते. पण जे नाही त्याची आपल्याला सतत जाणीव होत राहते. लग्नानंतरही हेच असते परंतु वेगळ्या फरकाने.
Leave a Reply