शिवराय

शिवराय

शिवराय म्हणजे स्वराज्यसूर्य. कधीकाळी महाराजांचा एवढा गवगवा का? राजकारण सार असं वाटायचं. पण वैयक्तिक आयुष्यातील अडचणी पहिल्या. मग महाराजांचे मोठेपण पटले. प्रत्येकाने महाराजांचा आदर्श घ्यावा.

लहानपणी घरी जाणता राजा नाटकाच्या श्राव्यफिती होत्या. अगदी पाठ झालेलं. पुढे शिक्षण अन नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये येणं झालं. सुरवातीचा काळ कठीण गेला. पुढे यशाचा काळ सुरु झाला. सुरवातीला दोन खोल्यांचं घर घेतलं. ते विकून तीन खोल्यांच घेतलं. भागातील पाणीप्रश्न वाढला. ते विकून नव्या ठिकाणी तीन खोल्यांचं घर घेतलं. गाडी, घर सगळं अगदी छान. नोकरीतील घुसमट कुणाला होत नाही? एके दिवशी राजीनामा देऊन स्वतःची संस्था उभी करण्याचा विचार केला.

अन तिथून खरं आयुष्य जगू लागलो. आर्थिक बाजू जेमतेम. शिते संपले म्हटल्यावर भुते कशाला राहतील? सोबत आजुबाजेचे वलय संपले. जीवनाच्या घाट वाटा मध्यरात्रीशी झुंज सुरु झाली. रोज एक नवीन संकट. जितकं स्वातंत्र्य तितकाच ताण. गृहकर्जरूपी औरंगजेब नाकाबंदी करू लागला. अचानक येणारी संकटे अक्षरशः धूळधाण उडवू लागली. काळरात्र संपेनाचं. सगळीकडे ताणच ताण. ताणाने एक आठवडा आजारीच पाडले.

व्यायाम नाही. आर्थिक अडचणी अन त्यात नवीन उद्योग चालू ठेवण्याचे आव्हान. मग आजारपण येणारच होते. सहज विचार करत असतांना महाराजांचा विचार आला. चार माणसांचे कुटुंब सांभाळणे इतकं कठीण असेल. तर महाराजांनी तीन लाखांच सैन्य. एक लाख घोडदळ. साडेतीनशेहुन अधिक गड कसे सांभाळले असतील. सहा सहा क्रूर शाह्या. त्यांच्यासमोर मूठभर सहकारी. कसा चमत्कार केला. उत्सुकता वाढली. इतिहासकारांच्या व्याख्यानातून महाराजांबाबत अधिकच कुतूहल वाढू लागले.

नुसत्या लढाया नव्हे तर शिवरायांचे दुर्ग विज्ञान. बलाढ्य गनिमांवर गनिमी चाल. वेगाचा व व्यक्तींचा अचूक उपयोग. अनेकदा संकटे आली. पण लढा सुरूच राहिला. बुद्धीचा आणि शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे शिवराय. पंधराव्या वर्षी स्थापन केलेली स्वराज्य नावाची संस्था पन्नाशीत ३५० हुन अधिक गडांची अन तळांची झाली. तीन लक्ष सहकारी. मग काय माझ्या मनातील ताण कुठं गेला माहित नाही. अन आजवर सापडला नाही.

शिवरायांनी याच भूमीत स्वराज्य उभे केले. तेही आपल्याप्रमाणेच ह्याच मातीत जन्मले. मग त्यांच्या पाइकांना काय अशक्य? मग आयुष्याशी लढतोय. तेही निर्भीडपणे. आर्थिक काय सर्वच आघाड्यांवर यश मिळेपर्यंत लढा सुरु राहील. महाराजांनी परिस्थिती समोर हार मानली नाही. महाराजांच्या नावानेच दगड देखील जिवंत होईल. मग आपण तर माणसे आहोत. छत्रपतींचे नाव घेऊन पहा बारा हत्तीचे बळ संचारेल. शिवराय हा मंत्र आहे. महाराज म्हणजे मराठी माणसांसाठी महामृत्युंजय मंत्र!!

Leave a Reply