संस्कृती हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक. संस्कृती भूगोलाला पूरक असते. खरतर भूगोलामुळेच संस्कृतीचा उगम होतो. भूगोलात बदल झाला तर संस्कृतीत बदल होतो. अन संस्कृती बदलली की भूगोल देखील बदलतो.
जिथं थंड वातावरण असते, तिथं लोक जाड आणि काळे कपडे घालतात. शरीराची उष्णता वाढवण्यासाठी उष्णतावर्धक पेय घेतात. जिथं खूप पाऊस पडतो. तिथं छत्री व कमी ओले होणारे कपडे वापरतात. अशाच एकानेक गोष्टीने संस्कृती जन्मते. खानपान देखील तसेच जिथं खूप उष्ण वातावरण असते तिथं खाण्यात गोडाचे प्रमाण अधिक असते.
आपल्या देशात इतकी विविधता का याचाही कारण तेच. कारण कुठं खूप पाऊस तर कुठे वाळवंट. कुठे खूप उष्णता तर कुठे भरपूर पाऊस. त्यामुळे संस्कृतीत वैविध्य निर्माण झाले. अन ते राहणार. त्यामुळेच लोकांच्या आचार, विचारात व भाषेत फरक राहणार. संस्कृती ही निसर्गपूरक असते. त्यामुळे जोवर संस्कृती आहे तोवर निसर्ग आहे. विकासाच्या नावाखाली आपण संस्कृतीत बदल केला आणि निसर्गाची हत्या घडू लागली. आज आपण पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आणली आहे.
दगडात अन झाडात कुठं देव असतो. असे म्हणून संस्कृतीची थट्टा केली. आपण अफाट वृक्षतोड केली. विकासाच्या नावाखाली पर्यावरणात देखील आपण बदल केले. अन आता सर्व भूभाग प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय देशात वनांना आगी लागत आहेत. आणि जपानमध्ये भयंकर वादळे तडाखा देत आहेत. आपल्याकडे दुष्काळ आणि तापमान ५० अंश गाठत आहे. आणि उत्तर भारतात पूर गावे वाहून नेत आहे.
तरीही आपण त्याच्या मुळाकडे साफ दुर्लक्ष करतो. सरकार नावाचा लाकूडतोड्या देशभर उन्माद करीत आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निसर्गाशी वैर ओढत आहे. भाषा हे संस्कृतीचे बाह्यरूप. भाषेतून आपण संस्कृतीची ओळख करू शकतो. इंग्रजी भाषेत ‘रेन रेन गो अवे’ म्हणजेच पावसाला जा म्हणणारी कविता आहे. तर मराठीत ‘येरे येरे पावसा’ ही कविता आहे. ह्यातून आपण दोन संस्कृतीतील फरक पाहू शकतो.
मराठी संस्कृती महाराष्ट्रातून जसजशी कमी होते. तसतसे दुष्काळ वाढत आहे. दुष्काळ पाणीप्रश्न निर्माण करतो. असे का? कारण आपण निसर्गपूजक आहोत. शिवरायांनी अगदी नौकाबांधणीसाठी इतर राज्यातून लाकूड मागवले. पण महाराष्ट्रातील वृक्षांना हात लावला नाही. वृक्षतोड करण्यासाठी ‘एकास पाच’ असा नियम केलेला. म्हणजे एक झाड तोडण्याआधी पाच झाडांचे संगोपन करायचे मग एक झाड तोडण्यास परवानगी. आताचे सरकार एका रात्रीत लाखो झाडांची यथेच्छ कत्तल करते. अन दुष्काळाला आपण निसर्गाला दोष देतो! गंमत आहे नई?
मुद्दा इतकाच की, संस्कृतीचे महत्व आपण मनापासून स्वीकारायला हवे. चालीरीती का कशासाठी ह्याचे पैलू आपण उलगडून पाहायला हवे! नाहीतर विनाश असाही डोळ्यासमोर होत आहेच!!
Leave a Reply