दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा

खरा दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा आहे. सोपं उदाहरण देतो. २००८ साली मुंबई हल्ला झाला. भयंकर चर्चा झाली. अनेकजण मारले गेले. त्यात पोलीस देखील होते.

बरीच खलबते झाल्यावर मुंबई पोलिसांना बुलेटप्रूफ जॅकेट का नाहीत याबाबत विचारणा झाली. आज अकरा वर्षे उलटून देखील मुंबई पोलिसांना बुलेटप्रूफ जॅकेट नाहीत.

अकरा वर्षात सत्तांतर झाले पण मानसिकता तीच. काय अडचण आहे? जॅकेटची किंमत रफाएल विमानांपेक्षा अधिक आहेत का?

बुलेटट्रेनसाठी ८८ हजार कोटींचे कर्जे घेतली. हजारो चौरस किमीचे जंगल उद्धवस्त केले. पुतळ्यासाठी ३००० कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. पण बुलेटप्रूफ जॅकेटसाठी शून्य!

सैनिकांच्या बाबतीतही तेच! त्या पुलवामाच्या हल्ल्याआधी गुप्तहेर खात्याने इशारा दिलेला! पण ज्या देशात पंतप्रधानांच्या हौशेखातर विमान खरेदी केले जाऊ शकते तिथे सैनिकांना कसला मान अन कसला जीव!

सैन्याला विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला काहीच अशक्य नाही. अडचण आहे ती राजकीय इच्छाशक्तीची!

चाळीस सैनिक ठार झाले! त्यांचे दुःख सोडा त्यांच्या हौतात्म्याचा वापर करून घेतला ह्या निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांनी!

देशातील दरवर्षी किमान ४०% भूभाग हा दुष्काळग्रस्त असतो. ६८% भूभाग हा दुष्काळप्रवण क्षेत्र म्हणून देखील चिन्हांकित केला गेला आहे.

पण गेल्या पाच वर्षांत किती धरण बांधली? उत्तर एक असे आहे! गेल्या पाच वर्षात आठ कोटींनी देशातील लोकसंख्येत वाढ झाली अन त्यांच्या तहान भागवण्यासाठी एक प्रकल्प केला!

मुळात देशातील पाणीप्रश्न निव्वळ सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे आहे. हाच काय अनेक गोष्टी केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने होत नाहीत.

मग ते सरकारी आरोग्य व्यवस्था असो वा रस्त्यांचे जाळे. बेरोजगारीवर तर न बोललेलं बर! सरकारी बँका बुडवण्याचा चंगच सरकारने बांधला आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण केली आहे.

हे प्रश्न राजकीय इच्छाशक्ती नसल्याचे द्योतक आहे. हा इच्छाशक्तीचा दुष्काळ कधी संपणार देव जाणे. देवावरून आठवलं! आमचे लाडके मुख्यमंत्री पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उज्जेनला गेले आहेत.

जर उज्जेन पाणीप्रश्न सोडवू शकले असते तर मध्यप्रदेशात आजमातीला ४००० गावे दुष्काळग्रस्त का घोषित झाली असती!

सर्व प्रश्न सुटू शकतात. निव्वळ राजकीय इच्छाशक्ती हवी! पैसा उभा केला जाऊ शकतो. कधीकाळी पुणे ते मुंबई प्रवास करण्यासाठी सहा सात तास लागायचे! स्वर्गीय बाळासाहेबांनी इच्छाशक्ती बोलून दाखवली.

अन तत्कालीन बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेबांनी द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प एकहाती पूर्ण केला. तेही सरकारी पैसे न वापरता! म्हणूनच म्हणतो राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळ मिटायला हवा!

ऑडिओ ब्लॉग:

आवाजामध्ये नोंद ऐका

काटकसर

काटकसर खरं तर कठीण गोष्ट आहे. मी बऱ्याच दिवसांपासून ते शिकण्याचा प्रयत्न करतोय. काटकसर म्हणजे कंजुषी नव्हे!

एकदा ‘वीजेची बचत’ नावाचा धडा वडील वाचून दाखवत होते. आमचे छोटे बंधुराज त्यावेळी बाजूला बसून ऐकत होते. त्यावेळी मी तिसरी-चौथीत असेल अन बंधुराज पहिली-दुसरीत!

एकतर बंधुराज एकपाठी! त्यातून बचतीचे महत्व ऐकले! मग काय पुढे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा बऱ्याच दिवसांनी आमच्या घरी आलेला. उष्ण वातावरणामुळे तो पंख्याचा वेग वाढवायचा. गप्पा गोष्टी करतांना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचा!

त्याने खोली बदलली की, बंधुराज त्या खोलीतील पंखा बंद करून टाकायचे! असा खेळ बराच वेळ चाललेला! मी व माझ्या वडिलांचे मनोरंजन होत होते. तेंव्हापासून आजपर्यंत टोकाची काटकसर करण्यात साहेब पटाईत आहेत!

पुढे नोकरीसाठी पुण्यात आलो. साधारण पाच एक वर्षात अनुभवाच्या आधारावर पगाराचे आकडे वाढले. लग्नानंतर सुखवस्तू प्रवास सुरु झाला. क्षेत्रातील अनुभवाच्या नऊ वर्षानंतर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

तिथून पुढे खऱ्या अर्थाने काटकसरीचे महत्व लक्षात आले. विचार करा. आपण माध्यम वर्गीय लोक पैसे येण्याआधीच खर्चाच्या योजना आखतो. मग कसे शिल्लक राहतील पैसे?

हा आपला स्वभाव प्रत्येक गोष्टी आहे. खरंच एखाद्या गोष्टीची गरज आहे का हा प्रश्न आपण स्वतःला कधी करत नाही.

कोणत्याही मध्यमवर्गीय व्यक्तीच्या घरी जा. तिथे तुम्हाला जवळपास सर्वच वस्तू आढळतील. त्यातील किती गोष्टी आवश्यक होते? मी टीका करत नाही. मी देखील याच गोष्टीतून गेलेलो आहे.

हवं तर अनुभव म्हणा! सोफा, किचन ट्रॉली! भला मोठा टीव्ही हवाच का? दर दोन चार महिन्यात कपड्यांची खरेदी आवश्यक आहे का? हाहा! असा विचार केला तर निम्याहून अधिक गोष्टी अनावश्यक वाटतील.

हौस करण्यात आपण बराचसा खर्च करतो. मग खर्च वेळेचा असो वा पैशाचा! दोन्हीही एकच! आपण अनावश्यक खर्च करून स्वतःलाच अडचणीत आणतो!

अन ते तेंव्हा लक्षात येते जेंव्हा आपण अडचणीत येतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट करतांना ‘मला याची खरंच गरज आहे का?’ हा प्रश्न स्वतःला विचारा!

मध्यंतरी उदयनराजे भोसलेंची मुलाखत पाहिली. राजघराण्यातील व्यक्ती! पण फोन पहाल तर फिचर फोन! ह्या गोष्टीतून आपण बराच बोध घेऊ शकतो!

काटकसर ही एक वृत्ती आहे. जी भविष्य उज्वल बनवू शकते!

ऑडिओ:

ब्लॉग आवाजाच्या स्वरूपात ऐका!

वेळापत्रक

वेळापत्रक तशी नवीन गोष्ट नाही. एकतर आपण आयुष्यात स्थिर स्थावर व्हायला वयाशी तीशी गाठतो. पुढे आर्थिक अन वेळेचे महत्व समजायला अधिक वर्षे गमावतो.

अर्ध्याहून अधिक आयुष्य वेळेचे महत्व समजण्यात जातात. मग उरलेल्या वेळेत घरगुती जबाबदाऱ्यात जाते. अनेक स्वप्न आपण पहात असतो. मग ते कधी पूर्ण करणार?

इथे वेळापत्रक किती महत्वाचे आहे, याचा अंदाज यावा. विचार करा आपलं सरासरी आयुष्य पन्नास-साठ जरी पकडलं तरी आपण निम्मं आयुष्य आताच गमावले आहे. निम्मं आयुष्य झोपण्यात व झोपेतून उठून आवरण्यात जाणार!

नोकरी/व्यवसाय करण्यासाठी जी वाहतूक करणार त्यात आयुष्याची काही वर्ष गमावणार. थोडक्यात सरासरी दर तासात आपण केवळ १० मिनिटे आर्थिक कमाईसाठी वापरतो.

अन कमाई कधी खर्च करणार? हाहा! यासाठी वेळापत्रक महत्वाचे आहे. सोपं गणित सांगतो. म्हणजे हे अनुभव घेऊन बोलत आहे. सकाळचा चार तास वेळ स्वतःसाठी काढू शकलो तर आपला दिवस सुरळीत जातो.

उठल्यानंतर पहिले चार तास

चार तास ह्यासाठी की, सकाळचा व्यायाम, दिनचर्या पूर्ण करण्यास साधारण तासभर जातो. पुढील तासभर ईमेल/सोशल मीडिया/वर्तमानपत्रसाठी देऊ शकतो. पुढील तासभर दिवसाचे नियोजन करण्यासाठी वा कालच्या दिवसाचा आढावा घेण्यासाठी देऊ शकतो.

पुढील एक तास चिंतन करण्यासाठी वा घरच्यांसाठी काढला तरी त्यांचाही दिवस आनंदायी जाऊ शकतो. खरं तर सकाळचे चार तासाचे नियोजन करण्याचे दैनंदिन धकाधकीत अतिशय अवघड आहे.

पण प्रयत्न केला तर अशक्य नक्कीच नाही. मलाही सुरवातीला अवघड गेलेले. सकाळी दिवसाचे नियोजन जर केले तर दिवसातील अनेक गोष्टीतील वेळ वाचतो. नाहीतर दिवस जाऊनही कामे अपूर्ण राहतात!

हे विसरलो! ते विसरलो! मग पुढे अनेक नसलेले प्रश्न उभे राहतात. मग ते सोडवण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागतो.

देवाने सर्वांना २४ तास दिले आहेत. मग अंबानी अब्जधीश होतात. अन आपण रोजच्या अडचणीत आयुष्य खर्च करतो. असे का होते?

यासाठी वेळापत्रक बनवा. व पालन करा. अन पहा! स्वप्न पूर्ण होतील! वेळ वाया घालणे हे पैसे वाया घालवण्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

चला तर मग वेळेला त्याचे महत्त्व देऊयात! जास्ती जगूयात. भविष्यावर फारसा विश्वास न ठेवता वर्तमानात जगूयात! प्रयत्न केलं तर काय अशक्य आहे? बाकी बोलूच!

इंटरनेट

इंटरनेट आज जगाच्या जवळपास सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. पण याचा आवाका किती? ह्याचा आकार किती? चला तर जाणून घेऊयात!

इंटरनेटला मराठीत आंतरजाल वा जाळं असं म्हणतात. एक सैन्य उपक्रम म्हणून अमेरिकेत याचा जन्म झाला.


Rossotti ची एक जुनी प्रतिमा, इंटरनेटच्या जन्मस्थळांपैकी एक. 
छायाचित्र:
रॉसॉटी, अल्पाइन इन बीअर गार्डन,

१९६९ मध्ये आर्पानेट नावाचे संगणकांचे जाळे बनले. जेअमेरिकेतील विद्यापीठे, सरकार व संरक्षण कंत्राटदारांशी जोडलेले होते. १९७० मध्ये ६० नोड्सने जोडले.

आताप्रमाणे त्यावेळी संगणकाचा आकार लहान नव्हता. भ्रमणध्वनी/मोबाईल तर विषयच नाही. त्यात जोडणी देखील खर्चिक व अडचणीची बाब होती.

अवकाशातील उपग्रहांचा वापर करून बिनतारी माहिती पाठवण्याचे तंत्रज्ञान पुढे विकसित केले गेलं. पुढे १९७४ साली रॉबर्ट कान आणि विंट सेर्फ दोन संशोधकांनी आयपी यंत्रणेची संकल्पना मांडली.

पुढे याचाच वापर करून १९७६ दोन व्यक्तींमध्ये नेटवर्क बनले. यासाठी इंटरनेटवर्क काँन आणि सेर्फने नवीन प्रोटोकॉल बनवला.

आज जगात पावणे दोन अब्ज वेबसाईट आहे. हा आकडा जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश इतका आहे.

१९७५ साली इमेल सुविधा सुरु झाली. २०१९ मध्ये ३.८ अब्ज लोक ही सुविधा वापरतात. यापैकी गुगलचे १ अब्ज वापरकर्ते आहेत.

१९८४ साली डोमेन सर्व्हर सुरु झाले. आयपी ऍड्रेस लक्षात ठेवण्याची गरज संपली. १९८९ मध्ये इंटरनेटचे तीस हजार वापरकर्ते होते.

१९८९ मध्ये वर्ल्ड वाईड वेब ही संकल्पना अस्तित्वात आणली. त्याच वर्षात एओएलची निर्मिती झाली. त्याचा फायदा इंटरनेट लोकप्रिय होण्यास झाला.

१९९० मध्ये द वर्ल्ड या डायल-अप इंटरनेट सेवेला सुरुवात झाली. गोफर या शोध प्रणालीची देखील निर्मिती झाली. ती मजकूरदेखील शोधत असे. याच साली एमपीथ्रीला मान्यता मिळाली.

१९९१ मध्ये पहिला वेबकॅमचा म्हणजेच ऑनलाईन कॅमेर्‍याचा केंब्रिज विद्यापीठामध्ये वापर केला गेला. याच काळात पहिले वेबपेज बनले.

पुढे १९९३ मध्ये मोझाईक हा पहिला ब्राऊझर उपलब्ध झाला. व सर्वाधिक प्रचलित ब्राऊझर बनला. पुढे अमेरिकेतील व्हाईट हाउस आणि शासकीय वेबसाइट इंटरनेटवर आल्या. व वेबमध्ये प्रथमच .gov आणि .org या दोन नामप्रकारांची निर्मिती झाली.

१९९४ मध्ये मोझाईकच्या ब्राऊझरला नेटस्केप नॅव्हिगेटर हा पहिला प्रतिस्पर्धी ब्राऊझर तयार झाला.

१९९५ मध्ये नेटस्केप कंपनीने सुरक्षित (SSL असलेला) ब्राऊझर तयार केला. पुढे इबे व अमेझॉन या वेबसाइटची सुरु झाल्या.

१९९६ मध्ये सर्वप्रथम हॉटमेल ही मोफत ईमेल सेवा सुरू झाली. १९९७ मध्ये वेबलॉग या पहिल्या ब्लॉगची निर्मिती केली गेली.

१९९८ मध्ये आजच्या जगप्रसिद्ध गूगल शोध यंत्राची वेबसाइट सुरू झाली. याच साली नेटस्केपने सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून फाईल्सची देवाण-घेवाण करणारा प्रोग्रॅम बनविला.

१९९९ मध्ये सेटी (SETI) हा प्रोग्रॅम इंटरनेटवर आला. जवळपास ३० लाख कॉम्प्युटरना जोडलेला या प्रोग्रॅमचे काम होते परग्रहावरील सजीवांचा शोध घेणे. इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या रेडिओ टेलेस्कोपमध्ये जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सेटीद्वारे केले जात होते.

२००१ मध्ये विकिपीडिया या वेबसाइटची निर्मिती झाली. २००३ मध्ये स्काईप (Skype) द्वारे प्रथमच इंटरनेटद्वारे आवाज संभाषणाला सुरुवात झाली.

२००३ साली MySpace आणि Linkedin या वेबसाइट सुरू झाल्या आणि सोशल नेटवर्किंगच्या युगाला सुरुवात झाली.

२००४ मध्ये फेसबुक ही सोशल वेबसाइट सुरु झाली. २००५ मध्ये यूट्यूब या चलचित्र मोफत ठेवण्याची सेवा देणारी सुरू झाली. २००६ मध्ये ट्‌विटरने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली.

तर असा आहे आपल्या इंटरनेटचा प्रवास!!

मराठीसाठी इंग्रजी बोला

मराठीसाठी इंग्रजी बोला. कदाचित हे आपल्याला हास्यापद वाटेल. परंतु, थोडा विचार केला तर हे आपल्यालाही पटेल.

इंग्रजी बोला म्हटलं की अनेकांची तंतरते! त्या गटात मी देखील मोडतो! हाहा!! मी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला असतांना ज्यांचं इंग्रजी उत्तम नाही अशांना इंग्रजी शिकवण्याचा घाट घालण्यात आला.

आठवड्याभरातच एक ट्रेनर कंपनी सुटल्यानंतर एक पन्नास लोकांच्या गटाला इंग्रजी बोलण्याच्या शिकवण्या घेऊ लागली. मीही त्यात होतो. ट्रेनर कसली कडकलक्ष्मी! पहिल्याच दिवशी यातील किती मराठी माध्यमातून शिकले असा प्रश्न केला!

अपेक्षेप्रमाणे जवळपास सर्वांनीच हात वर केले. त्यावर बाई, ‘तुम्ही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे तुमची इंग्रजी कच्ची आहे’ वगैरे बोलू लागली. अनेकांना ती बाब खटकली! काही जणांनी बोलून देखील दाखवली. मुळात चांगलं इंग्रजी येण्यासाठी तो वर्ग होता.

बाईंनी दुसऱ्या दिवशी, ‘शालान्त शिक्षण घेऊनही तुम्हाला अजूनही इंग्रजी येत नाही. याचा कमीपणा वाटत नाही का?’ वगैरे बोलून भडका उडवून दिला. अपेक्षेप्रमाणे अनेकांनी त्यावर प्रतिवाद केला. खरं तर दोन्हीही बाजूने मते योग्य होती. वाद विकोपाला गेलेला. ट्रेनर बदला म्हणून कंपनीत विषय होऊ लागला.

विनाकारण बाई इंग्रजीच्या नावाखाली मराठी आव्हान देत होते. पुढील दिवशी बाईंनी, मला तुमची इंग्रजी किती चांगल्या बोलू शकता हे पाहायचे आहे म्हणून एक एकाने समोर येऊन बोला म्हणू लागली. कोणीही पुढे जायला तयार होईना. शेवटी मी पुढे जाऊन बोलण्याचे ठरवले!

खरं तर काहीतरी करून दोन दिवसांची उत्तरे द्यायची होती. व चूक देखील दाखवून द्यायची संधी होती. पुढे जाऊन (अगदी घोकंपट्टी झालेले सर्वांचं वाक्य) “हॅलो ऑल” वगैरे केलं.

बाईंनी ‘व्हाट इस सब्जेकट?‘ विचारलं! मी उत्तरलो ‘इंग्लिश इस माय सब्जेक्ट’. बाईंनाच काय कुणालाच कळलं नाही. बाईंनी पुन्हा विचारल्यावर, उत्तरलो ‘इंग्लिश लँगवेज इस माय सब्जेक्ट’!

पुढे काय मग सुरूच झालो ‘आय डोन्ट थिंक इंग्लिश इस ग्लोबल लँगवेज’. बाई मला तोडत म्हणाल्या ‘व्हाय’! मी उत्तरलो ‘इफ यु गो इन चायना, फ्रांस, जपान, जर्मनी ऑर इन युरोपिअन कंट्रीज. दे हॅव देअर ओन लँग्वेजेस’. एकच हास्यकल्लोळ माजला!

पुढे ‘आय वॉन्ट तो लर्न इंग्लिश ओन्ली फॉर ऑफिशिअल पर्पझ. इफ आय गो इन मार्केट ऑर इन बस. अँड इफ आय स्पीक इन इंग्लिश दे विल नॉट अंडरस्टँड‘! मग काय दोन दिवसाचा वचपा निघालेला. बाई चार वाक्यातच शब्दामागील गर्भित अर्थ समजून गेल्या. अन मराठीवरून चाललेला तो वाद कायमचा निकाली निघाला!

तेंव्हापासून एक लक्षात आलं की, काही लोकांना इंग्रजीत सांगितल्यावर ताबडतोप कळते! 🙂 त्यामुळे भीती सोडा! मराठीसाठी इंग्रजी बोला!

सायकल

सायकल चालवणं तस नवीन नाही. बऱ्याच दिवसांपासून ठरवलेलं. परंतु अनियमितता होती. शेवटी गेल्या दोन दिवसांपासून सायकलपुराण सुरु झालं. (more…)

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत माझे मत! कोणत्याही मुद्याला दोन बाजू असतातच. प्रत्येकजण आपली मते आपल्या अनुभवावरून बनवतो! त्यामुळे कोणतीही बाजू चुकीची नसते! असे निदान मी तरी मानतो! (more…)

पाणी प्रश्न आणि उपाय

नमस्कार, ट्विटरसंमेलनमध्ये मत मांडण्यास संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून आभार मानतो. याच थ्रेडमध्ये ‘पाणी प्रश्न आणि उपाय’ या विषयावर मी माझे मत व्यक्त करतो! (more…)

हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही

हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही. धक्का बसला ना. राज्यघटनेतील कलम ३४३ चे चुकीच्या अर्थाने देशभरात हा गैरसमज पसरलेला आहे. हो, हे खरे आहे. मी देखील शालेय जीवनात हिंदी राष्ट्रभाषा आहे असेच शिकलो. परंतु ते धादांत खोटे आहे. सुरवातीला मलाही धक्काच बसलेला. (more…)

दुष्काळ आणि राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प

दुष्काळ पडू नये म्हणून राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या देशात एकवेळ पाऊस येईल की नाही याबाबत साशंकता असेल पण दुष्काळ अगदी पक्का असतो. यावेळी तर हिवाळ्यातच महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला. (more…)