टॅग: नोंद

नोंदी

नोंदी

नोंदी लिहिण्यासाठी सुचावं लागत. अन त्याहून मोठं त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मध्यंतरीच्या बराच मोठा काळ दोन पैकी एक गोष्ट नसल्याने काहीही होत नव्हतं. अगदी ठरवून देखील. परंतु, गेल्या काही दिवसातील परिस्थिती पुन्हा लिहिण्यास उद्युक्त करीत आहे.

एक चीड, विचार मनात वादळ निर्माण करतो. अन नोंद तयार होते. प्रत्येकाला मन मोकळं करावस वाटत. मन मोकळं करण्यासाठी प्रत्येकाचे मार्गही वेगेवेगळे. मी नोंद खरडून सुखावतो. इथ जे स्वातंत्र्य आहे ते समाजमाध्यमांवर नाही. तिथं प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला. अन राजकीय पक्षांच्या सुळसुळाट झाल्यापासून तिथं कुविचारांचं प्रदूषणच अधिक. त्यामुळे या न त्या कारणाने इकडे येणं होत!

हजारो विषय आहे. हजारो संकल्पना आहेत. अनेक विषयावर मत मांडायचं आहे. पण कुठून सुरवात करावी हेच कळेना. शेवटी आज तो दिवस उगवला. कोणतीही गोष्ट सातत्याने करण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करीत असतो. चुकून एखाद्या विषयात यश येते. नोंदीत देखील यश येतेय का ते पाहूया.

आजूबाजूच्या घटना अगदी तापदायक आहेत. एकूणच परिस्थती अधिकच गंभीर होत आहे. व्यावसायिक पातळीवर आशेचा किरण दिसतोय. पण देशातील परिस्थितीमुळे मनःशांती नाही. प्रत्येकजण विचारांचा चष्मा घालून जग पाहतोय. मोकळ्या डोळ्याने जे दिसत तेच त्यांना त्यामुळे दिसेनासे झाले आहे. तीच खदखद ह्या नोंदी खरडण्यास प्रवृत्त करते. परिस्थतीत सुधारणा होईना. अन लोकांना सुधारणा व्हाव्या असेही वाटेना. सगळेच चिखलात यथेच्छ डुंबत आहेत. कुणास सांगावे तर तोही चिखलात ये म्हणतो!

सकारात्मक विचार करायचा असं मी रोज ठरवतो. पण रस्त्यांवरील खड्डे दादा चिडवतात. रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत आडवे तिडवे फलक अन त्यातून डोकावून हसणारे दादा, मामा, नाना, कार्यसम्राट खिजवतात असाच भास होतो.

अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि नियमबाह्य शासकीय कारभार एकेदिवशी माझाही माधव आपटे करणार हे नक्की. तक्रारींना शासन जुमानेना. आजूबाजूची परिस्थिती अन त्यात महागाईने आर्थिक यश देखील गोड लागेना. इतर देशांमध्ये जसा महागाई आणि सार्वजनिक प्रश्नांनी उद्रेक होतो तसा आपल्याकडे होईल का? बर वर्तमानाचं नसेल तर भविष्यासाठी कुठवर आशावादी राहायचं?

मग पुन्हा विचार येतो महाराजांचा. सहा शाह्या असतांना त्यांना भेदून स्वराज्य उभं राहील! एक न अनेक संकटे आली! अन मराठी वाघांनी ती पेलली! अन आताच्या तीन देशांवर स्वराज्य उभं केलं. अन पुन्हा आशेचा किरण दिसतो. लढण्याची उमेद जागी होते. हीच उर्मी आर्थिक आणि सामाजिक स्वराज्य, स्वातंत्र्याची पहाट आणेल! असो, अजूनही शब्दांच्या माळा मनातून ह्या नोंदीत उतरत आहेत! पण अतिरेकही वाईट! वाचकाला छळून कसे चालेल? तूर्तास इथं थांबतो! बाकी बोलूच!!

 

कायदा आणि आपण

खरं तर कायदा बद्दल काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे? (more…)

आधारकार्ड : माझा विरोध कशासाठी?

काही बोलण्याआधी काही स्पष्ट करावेसे वाटते. आधारकार्ड एक चांगली योजना आहे. परंतु ज्या प्रकारे तिचा आवाका वाढवला त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना अशी योजना असावी ही त्यावेळचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी चाचपणी झाली. त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंह यांच्या काळात याला मूर्त स्वरूप आले. रेशन व अन्य काही गोष्टीपुरता याचा आवाका होता. २००९ साली निलेकेणी या इन्फोसिस संस्थापकांचा मार्गदर्शनाखाली एक कंपनी सुरु करण्यात आली. मला युआयडीएआयच्या इतिहासात जायचं नाही. थोडक्यात, सरकारने एका भागीदार झाले. मग काय नियम असतील. कायदा कसा असेल यातही निलेकेणी यांच्या सौ. कंपनीने सरकारला सल्ले दिले! (more…)

नोंद

नोंद! इतक्या उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. माझा संगणक गेल्या काही दिवसांपासून ‘कोमात’ गेला असल्याने बोलणे शक्य नाही झाले. पण सर्वांच्या प्रतिक्रिया मी माझ्या मोबाईलवरून नियमित वाचत होतो. सर्वांच्या प्रतिक्रिया मला मान्य आहे. माझ्याकडून खूपच गोंधळ आणि रटाळपणा चालू आहे. जवळपास गेल्या दीड वर्षात नोंद बाळ ३६३ पावले, म्हणजे ही नोंद पकडून ३६४ पावले दुडूदुडू धावला. त्यातील साठी पेक्षा अधिक नोंदी तिच्यावरच आहेत. गेल्या चार महिन्यात मी ‘अप्सरा’ सोडून इतर विषयावर खूपच कमी बोललो, हे खर आहे. प्रत्येक नोंदीत तेच तेच आणि तोच तोच पणा आला, हे देखील खर आहे. (more…)