टॅग: नोंदी

नोंदी

नोंदी

नोंदी लिहिण्यासाठी सुचावं लागत. अन त्याहून मोठं त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मध्यंतरीच्या बराच मोठा काळ दोन पैकी एक गोष्ट नसल्याने काहीही होत नव्हतं. अगदी ठरवून देखील. परंतु, गेल्या काही दिवसातील परिस्थिती पुन्हा लिहिण्यास उद्युक्त करीत आहे.

एक चीड, विचार मनात वादळ निर्माण करतो. अन नोंद तयार होते. प्रत्येकाला मन मोकळं करावस वाटत. मन मोकळं करण्यासाठी प्रत्येकाचे मार्गही वेगेवेगळे. मी नोंद खरडून सुखावतो. इथ जे स्वातंत्र्य आहे ते समाजमाध्यमांवर नाही. तिथं प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला. अन राजकीय पक्षांच्या सुळसुळाट झाल्यापासून तिथं कुविचारांचं प्रदूषणच अधिक. त्यामुळे या न त्या कारणाने इकडे येणं होत!

हजारो विषय आहे. हजारो संकल्पना आहेत. अनेक विषयावर मत मांडायचं आहे. पण कुठून सुरवात करावी हेच कळेना. शेवटी आज तो दिवस उगवला. कोणतीही गोष्ट सातत्याने करण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करीत असतो. चुकून एखाद्या विषयात यश येते. नोंदीत देखील यश येतेय का ते पाहूया.

आजूबाजूच्या घटना अगदी तापदायक आहेत. एकूणच परिस्थती अधिकच गंभीर होत आहे. व्यावसायिक पातळीवर आशेचा किरण दिसतोय. पण देशातील परिस्थितीमुळे मनःशांती नाही. प्रत्येकजण विचारांचा चष्मा घालून जग पाहतोय. मोकळ्या डोळ्याने जे दिसत तेच त्यांना त्यामुळे दिसेनासे झाले आहे. तीच खदखद ह्या नोंदी खरडण्यास प्रवृत्त करते. परिस्थतीत सुधारणा होईना. अन लोकांना सुधारणा व्हाव्या असेही वाटेना. सगळेच चिखलात यथेच्छ डुंबत आहेत. कुणास सांगावे तर तोही चिखलात ये म्हणतो!

सकारात्मक विचार करायचा असं मी रोज ठरवतो. पण रस्त्यांवरील खड्डे दादा चिडवतात. रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत आडवे तिडवे फलक अन त्यातून डोकावून हसणारे दादा, मामा, नाना, कार्यसम्राट खिजवतात असाच भास होतो.

अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि नियमबाह्य शासकीय कारभार एकेदिवशी माझाही माधव आपटे करणार हे नक्की. तक्रारींना शासन जुमानेना. आजूबाजूची परिस्थिती अन त्यात महागाईने आर्थिक यश देखील गोड लागेना. इतर देशांमध्ये जसा महागाई आणि सार्वजनिक प्रश्नांनी उद्रेक होतो तसा आपल्याकडे होईल का? बर वर्तमानाचं नसेल तर भविष्यासाठी कुठवर आशावादी राहायचं?

मग पुन्हा विचार येतो महाराजांचा. सहा शाह्या असतांना त्यांना भेदून स्वराज्य उभं राहील! एक न अनेक संकटे आली! अन मराठी वाघांनी ती पेलली! अन आताच्या तीन देशांवर स्वराज्य उभं केलं. अन पुन्हा आशेचा किरण दिसतो. लढण्याची उमेद जागी होते. हीच उर्मी आर्थिक आणि सामाजिक स्वराज्य, स्वातंत्र्याची पहाट आणेल! असो, अजूनही शब्दांच्या माळा मनातून ह्या नोंदीत उतरत आहेत! पण अतिरेकही वाईट! वाचकाला छळून कसे चालेल? तूर्तास इथं थांबतो! बाकी बोलूच!!

 

पुनःश्च हरी ओम

पुनःश्च हरी ओम आता कितवा आहे ते सांगता येणार नाही. पण पुन्हा नोंदी लिहिण्याचा यत्न करणार आहे. अनेकदा ठरवूनही यात सातत्य काही येईना. ज्या गोष्टीने दशकभरापूर्वी वेड लावलेलं आज ती गोष्ट कृतीत आणण्याचा काही योग येत नाहीये.

खरं तर टाळेबंदी अन कोरोनाच्या कृपेने अनेक विषय डोक्यात येतात. परंतु पूर्वी (पूर्वीचा अर्थ दहा वर्षे आधी) प्रमाणे ते काही मांडता येत नाही. माझ्या लहानपणी बहुतांश मुलांप्रमाणे माझ्यातही न्यूनगंड होता. प्रत्येक गोष्ट आपण करतो ती चुकीची असते वा होते असा माझा ठाम समज गैरसमज होता. शालेय जीवनात असतांना तर मला दुसरा करतोय ते बरोबर अन मला वाटते ते चुकीच असं वाटायचं! त्यातून व्यावसायिक जीवनात आल्यावर अगदी उलटा स्वभाव बनला.

सुदैवाने अनेक गोष्टी सकारात्मक घडत गेल्याने त्या स्वभावाची काही अडचण निर्माण झाली नाही. परंतु आता पस्तीशी ओलांडल्यावर मध्यबिंदूवर असावे असं वाटत. तसं अवघड आहे. पण प्रयत्न करत असतो. आक्रमक स्वभावाला मुरड घालतो. तात्काळ प्रतिक्रियावादी न होण्याकडे भर देतो. समजूतदारपणा खरं तर सगळ्यांकडेच असतो परंतु आजूबाजूचे वातावरण अन परिस्थिती आपल्या स्वभाव अन वागण्यावर फार मोठा प्रभाव पाडते.

खरं तर आज ह्या गोष्टी बोलण्याचा तसा काही विशेष अर्थ नाही. परंतु, आपण जे ठरवतो ते कृतीत यायलाच हवं असा दंडक गेल्या काही वर्षे केलाय. काही बाबतीत ते यशस्वी देखील झालंय. परंतु सगळ्याच क्षेत्रात अजून यश मिळालेलं नाही. त्यापैकीच एक म्हणजे नोंदी/ब्लॉग चा प्रपंच!

अनेक गोष्टी करायच्या आहेत. अनेक गोष्टींवर मते मांडावीशी वाटतात. परंतु, प्रापंचिक माणसाला प्रपंच नेटका करण्यात बराचसा वेळ खर्ची घालावा लागतो. अन अनेक संकल्पना अन गोष्टी पुढे ढकलल्या जातात! तसं अशक्य काहीच नाही. प्रयत्न केल्यास यश मिळते. काही वेळेस तुम्हाला झुंज द्यावी लागते. पण प्रयत्न करीत राहिल्यास यश मिळण्याचा हमखास योग्य! हे सगळे अनुभव आहेत. तर त्याच अनुभवाच्या ज्ञानावर रोज किमान एक नोंद लिहिण्याचं प्रयोजन केलेलं आहे.

पाहुयात यावेळी तरी यश मिळवता येतंय का ते! ते कुणीतरी म्हटलंय ना ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’. फारच पिळलं का? बऱ्याच दिवसांनी असं मनमोकळं बोलतोय त्यामुळं समजून घ्याल ही अपेक्षा करतो.