खरं तर समाज माध्यमांविषयी काही बोलावं असं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु, सातत्याने समाजमाध्यमांवर येणारी बंधने बोलायला भाग पाडतात.
साधारण, वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल. माझा असाच एक मित्र! साधारण त्याच्याशी आभासी जगातुन झालेल्या संपर्काला आता एक तप झालं असेल. त्यावेळी म्हणजे साधारण २००८-०९ च्या सुमारास, तो अन मी नोंदी/ब्लॉगद्वारे व्यक्त व्हायचो. पुढे ब्लॉग लिहिण्यात फारसा रस राहिला नाही. अन संपर्क तुटला.
पुढे २०१६ मध्ये ट्विटर या समाजमाध्यमाद्वारे पुन्हा संपर्कात आलो. त्याहीवेळी त्याच्याकडून समाज माध्यमांवर येणारी बंधने विषयी माहिती मिळायची. परंतु, तसा अनुभव नसल्याने फारसं गांभीर्य वाटत नसायचे! साधारण दोन वर्षांपूर्वी त्याने कंटाळून पुन्हा ब्लॉग सुरु करायचे ठरवले. अन पुनश्च आमचा संपर्क कमी होत गेला.
त्याचा विषय घेण्यामागे तो त्यावेळी ज्या गोष्टी सांगायचं ते मी मध्यंतरी अनुभवल्या. राजकीय स्वार्थासाठी (खरं तर त्यामागे अर्थकारण दडलंय) एका प्रतिष्ठित समाज माध्यमाने बिनदिक्तपणे कोणतेही कारण न देता परस्पर निलंबित केले. पुढे वर्षभर मी दुसऱ्या खात्यावरून विचार मांडण्याचा प्रयत्न केला परंतु, तिथेही हजारदा संबंधित समाजमाध्यमाकडून अडचणी उभ्या टाकायच्या!
मग मी समाज माध्यम बदलून माझे विचार मांडायला सुरवात केले! तिथेही जाणीव व्हावी इतका त्या समाज माध्यमांचा अंकुश! खरं तर प्रत्येकजण आपले मत मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करीत असतो. परंतु, जर तेच होणार नसेल तर तिथे जाण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो!
एका ठराविक पक्षविशेष पटेल तेच दाखवणे वा त्या खात्यावर अप्रत्यपणे बंधने लादणे खरं तर हा त्या खात्यांचा कमाईचे साधन असू शकेल. परंतु, त्याने एक गोष्ट अधिरेखित होते की समाज माध्यमे एकाधिकारशाही गाजवतात! त्यामुळे पुनश्च हरी ओम करण्याचे योजलेले आहे! पाहुयात हा उत्साह किती काळ टिकतो ते!