मराठी शाळा मराठी भाषेचे मूळ आहे. तेच छाटणे सुरु आहे. भाषा केवळ संवादाचे साधन नाही. संवादासह अर्थव्यवस्था आहे. संस्कृतीचे बाह्यरूप आहे. उदाहरण म्हणून सांगतो. अमेरिकादी देशात नोकरी, राहण्यासाठी भाषेची चाचणी परीक्षा द्यावी लागते. पुढारलेले असूनही ते असे का करीत असावे?
याचे कारण त्यांना त्यांची संस्कृती जपायची आहे. संस्कृतीचे बाह्यरूप म्हणजे भाषा. भाषेतून समाजाचे प्रतिबिंब दिसते. युरोपीय देशांनी भाषेवर देश निर्माण केले. आता तो भारतीय दृष्टिकोनातून मूर्खपणा आहे. युरोपीय राष्ट्रवाद एक भाषा / संस्कृती / खानपान म्हणजे एक समाज वा राष्ट्र म्हणते. अगदी एक झेंडा. एक गीत वगैरे. आपल्याकडे बहुविध संस्कृती आहे. अफाट विविधता आहे. तरीही आपण एक समाज आहोत. कारण यात आपल्याला गैर वाटत नाही.
देवांचे उदाहरण घेऊया. आपल्या घरात, इमारतीत, चौकात वेगवेगळे देव असतात. अगदी ग्रामदैवत, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्यांचे अन देशाचे सुद्धा देव आहेत. पण त्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही. किंवा माझ्या घरातलाच देव खरा. इतरांचे खोटे देव. अस कोणी म्हणत नाही. कारण सर्व मार्ग देवापर्यंत जातात. इतकंच काय प्रत्येकाच्या सत्याला आपण सत्य म्हणतो. याउलट चूक की बरोबरमध्ये पाश्चिमात्य देश अडकलेले आहेत.
आमचाच धर्म खरा. आम्हीच देवाकडे घेऊन जाऊ शकतो. ही पाश्चिमात्यांची भूमिका. आपल्यात अन त्यांच्या संस्कृतीत हा फरक आहे. त्यामुळेच जगातील सर्वाधिक भाषा इथं जन्मल्या अन वाढल्या. आजही जगात सर्वाधिक भाषा बोलणारे आपण आहोत. पण दुर्दैवाने युरोपीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेने आपल्या येथील राष्ट्रवादी मंडळींना वेडे केलेले आहे. वेडेपणा इथवर गेलाय की, फ्रान्स, रशिया, चीन प्रमाणे सक्तीने एक भाषा म्हणजे एक राष्ट्र असा समज करून घेतला आहे.
सर्वांनी एकच भाषा बोलायला हवी. ह्या एका वेडेपणामुळे कधीकाळी हजारो भाषा बोलणारे आपण आता ७८० वर आलो आहोत. अन आहे त्यातील पुढील पन्नास वर्षात २५० भाषा मारून टाकू अशी परिस्थिती आहे. जगभर हा वेडेपणा सुरु आहे. २०५० सालापर्यंत जगातील ७००० भाषांपैकी ९०% भाषा मारल्या जातील असा अंदाज भाषा संशोधकांचा आहे. आपण स्वतःला लोकशाही म्हणवतो. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. लोक जर राजे असतील तर त्यांच्या भाषांना शासनलेखी महत्व का नाही? महत्व सोडा सरकार गेल्या ७५ वर्षांपासून एकाच भाषेवर अफाट खर्च करीत आहे. अन इतर भाषांना संपवण्याचा विडाच उचलला आहे.
एकट्या मराठी बाबतीत बोलायचं झालं तर एका दिवसात १५ हजार शाळा बंद केल्या. असं जगात अन्यत्र कुठेही घडलेलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की एका दिवसात दीड लक्ष विद्यार्थी आणि किमान १५ हजार शिक्षक शिक्षणबाह्य झाले. तिकडे जपानमध्ये एका शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जपान सरकार अतिद्रुतगती लोहगाडी (बुलेट ट्रेन) पळवते. अन आपण दुर्गम भागातल्यांना वाऱ्यावर सोडतो.
इमारतींची डागडुजी, शिक्षक भरती, स्वच्छतागृह, वीज यांची वानवा आहे. शाळेला शिक्षक हवे म्हणून मागणी केली म्हणून पालकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकारही घडलेले आहेत. सोप्या शब्दात मराठी शाळा बंद केल्या की अपरिहार्यपणे हिंग्रजी शाळांचा व्यवसाय वाढेल.
एक जातो तर दुसरा येतो. अशी अवस्था आहे. मराठी शाळा इंग्रजीत माध्यमाच्या करण्याच्या तसेच ‘दत्तक’ शब्दाच्या नावे ६२ हजार शाळा खासगी धनाढ्यांना देण्याचा देखील उद्योग राज्य सरकारने आरंभलेला आहे. आधी मराठी भाषिकांना शिक्षणाच्या माध्यमातून बहुभाषिक केलं. आता शिक्षणातून मराठी माध्यम काढून सरकार मराठी भाषेचा वांशिक उच्छेद करीत आहे. काही शाळा तर झोपड्यात चालवल्या जातात.
शासन आधीही आणि आताही मराठीचा द्वेष करते हे ह्या सर्व प्रकारातून स्पष्ट होते. मराठी भाषिकांनी याचा गंभीरपणे विचार करावा. अन शक्य असल्यास स्वतःच्या मराठी शिक्षण संस्था उभ्या कराव्यात.



