टॅग: समाधान

शांतता

शांतता

शांतता ही महत्वाची गोष्ट आहे. जिथे शांतता नांदते, तिथे प्रगती निश्चित होते. गोंगाट लक्ष विचलित करतो. गोंधळ, गोंगाट जिथे वाढतात तिथे अशांतता वाढते. अन प्रगतीचा वेग मंदावतो. त्यामुळे शांतता महत्वाची.

शांतता आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची आहे. शांततेमुळे आपल्या कामात लक्ष लागते. अन काम नीट होते. जितके एकाग्रतेने काम होते. तितका त्या कामाचा दर्जा सुधारतो. अशांततेमुळे शाररिक आणि मानसिक त्रास वाढतो. हृदयाचे स्पंदने वाढतात. त्यामुळे शारीरिक समतोल बिघडतो. आणि त्याचा परिणाम शरीराबरोबर कामावर देखील होतो.

सुख आणि समाधान ह्या गोष्टी शांततेमुळे सहजप्राप्त होतात. देवळात गेल्यावर आपल्याला समाधान का मिळते? कारण तिथं शांतता असते. आता तुम्ही या उदाहरणाची तुलना पुण्यातील दगडूशेठ वा मुंबईचा सिद्धिविनायक वा पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणीच्या देवळासोबत करू नका. ती प्रसिद्धी पावलेली अन सदा गजबजलेली ठिकाणे आहे. तिथे देवाचं दर्शनऐवजी धक्काबुक्की होईल.

धार्मिक ग्रंथ देखील हीच शिकवण देतात. तेही याचमुळे. माणसेच काय देश देखील अशांत झाले की संहारक होतात. वनातील  श्वापदांप्रमाणे जीवावर उठतात. युद्ध, प्रदूषण वाढवून निसर्गाची व स्वतःची हानी करतात. स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असावे. त्याखेरीज आपण सुसंवाद साधू शकत नाही. शांतता सुसंवादामुळे टिकतो. अडचणी कमी करतो.

व्यक्तीने समाज आणि समाजाने राष्ट्र घडते. व्यक्ती सर्व गोष्टींचा गाभा आहे. जेवढी आसक्ती कमी तेवढ्या गोष्टी सहजसाध्य होतात. प्रादेशिक असमतोल वाढण्याचे मूळ कारण हेच. असमतोलच जर दूर केला तर वाद येणार कुठून? वाद नसेल तर शांतता टिकवणे शक्य आहे. ऐतिहासिक काळ चाळला तर शूरवीरांच्या भूमीत प्रगती अन शांतता नांदलेली दिसेल. शौर्याच्या बळावर त्यांनी स्वतःची प्रगती केली.

देश, समाज ह्या मोठ्या गोष्टी आहेत. आपण स्वतःला जरी शांत ठेवलं. आपला आजूबाजूचा, घराचा परिसर देखील शांत ठेवला तरी ह्यात आपलेच हित आहे. अकारण चीडचीड. निष्कारण वाद हे हितवाह नसतात. त्यातून शांतता बिघडते. अन प्रगतीला अडसर निर्माण होतो. ह्याचा अर्थ सहन करा असा मुळीच नाही. पण सुसंवादाची कला अवगत केली तर बदल शक्य आहेत. खरतर ह्या गोष्टी वयाच्या एका टप्प्यानंतर आपोआप उमजतात. त्यामुळे फारशी चिंता नसावी. शांततेचे महत्व जरी जाणले तरी अनेक बदल सहजसाध्य आहेत.

बाप्पा

बाप्पा

बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. कधीकधी आपल्या संस्कृतीची गंमत वाटते. कसाकाय गणेशोत्सव सुरु झाला? पण त्याने घरोघरी वातावरण आनंदून जात हे मात्र नक्की. सार्वजनिक गणेशोत्सवांवर खूप बोलून झालाय. त्यावर नव्याने बोलायची गरज नाही.

माझ्या जन्मगावी गल्लीत गणपतीच देऊळ. माझ्या आजोळ म्हणजे चिंचवडगाव. म्हणजे मोरया गोसावींचे गाव. त्यामुळे लहानपणापासून बाप्पाच्या सानिध्यात लहानपण गेलं. आई वडील दोन्हीही आस्तिक. मी न धड आस्तिक न नास्तिक. जे पटते ते पाळतो. गल्लीतील देऊळ म्हणजे आम्हा मुलांसाठी केंद्रच होत. तिथं तासनतास बसून गप्पा चालायच्या. त्यामुळे एक नातं निर्माण झालं. देऊळ झाडून काढण्यात आनंद यायचा. आताही येतो. एक समाधान मिळते.

वडिलांच्या बोलण्यातून देवळातील गणपतीची रोज पूजा व्हायला हवी असं आलं. अन का कुणास ठाऊक देवाची अंघोळ घालण्याची इच्छा झाली. अन मग रोज सकाळी अंघोळ झाल्यावर कळशीभर पाणी घेऊन मी देवळात जायचो. वडिलांमुळे पाढे, रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणायची सवय लागलेली. त्यामुळे देवळातील अथर्वशीर्षचा म्हणतांना अडचण आली नाही. अन तिथून अथर्वशीर्ष पठाणाची सुरवात झाली.

खरं तर हे धार्मिक वाटेल. परंतु, बाप्पाच्या सहा फुटी मूर्तीला रोज अंघोळ घालून गंध लावणे. आरती फारच आत्मिक समाधान आजही देते. गणेशोत्सव तर त्याकाळी दिवाळीपेक्षा मोठा सण असे. आम्ही लहान पडायचो. त्यामुळे वडील मंडळींची कामे ऐकावी लागायची. अन आरतीच्या वेळी घंटा वाजवण्याची संधी प्रत्येकाला हवीहवीशी वाटायची. पण लहान असल्याने एकतर उंची पुरत नसे. अन वाजवण्यासाठी पुढे गेले की कोणीतरी मोठं माणूस ओरडे.

गल्लीतील बाप्पा. पूर्वी हा खूपच सुंदर दिसायचा. एखाद्या गुटगुटीत बाळाप्रमाणे. पण नंतर कुणाच्या मनात खूळ आलं. अन त्यांनी ह्याचा शेंदूर काढला. अन हा म्हातारा दिसू लागला.

माझ्या मित्रांच्या आग्रहामुळे गल्लीतील मुलांचा गणेशोत्सव सुरु झाला. पुढे त्याचे स्वरूप इतके वाढले की, लोक स्वतःहून देणगी द्यायचे. आम्ही सर्वजण अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन करू लागतो. पुढे माझे वडील आणि त्यांचे काही सहकाऱ्यांनी भंडाऱ्यांची सुरवात झाली. आताही तो भंडारा नेहमी होतो. अगदी कुणी नसेल तर माझे वडील पुढाकार घेऊन तो घडवून आणतात. एकूणच खूपच आनंदाचे वातावरण असते.

बाप्पा

हा गेल्यावर्षीचा गणपती बाप्पा. हा आला की, घर भरल्याप्रमाणे वाटते.

मुळात बाप्पाची मूर्ती भुरळ पाडते. मलाच काय माझ्या दोन्ही चिमुकल्यांना देखील बाप्पा खूप आवडतो. कामानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाल्यावर माझ्या सदनिकेत दरवर्षी बाप्पा येतो. आमची इमारतीतील गणेशोत्सवाची सुरवात देखील मी केलेली. घरच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा माझ्या दोन्ही चिमुकल्यांच्या हस्ते होते. एकूणच हे दिवस आनंदाचे असतात. आता काही सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवाच्या, वर्गणीच्या नावाखाली स्वतःची हौस भागवतात. चौक अडवतात. ध्वनिप्रदूषण करतात. ते कुणालाच पटणार नाही. परंतु, माझ्यापुरते बोलायचं झालं तर बाप्पा येणार हा आभास देखील सुखावून जातो. तूर्तास इतकेच.

सुख

सुख

सुख मिळवण्यासाठी प्रत्येकजण झगडतो. सुखाची व्याख्या देखील प्रत्येकाची निराळी. अन ते मिळवण्यासाठी काय करावे. यासाठी अनेक मार्ग चोखंदळतात. पण सुख हे मानण्यात असत. हा माझा अनुभव आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती. कुणाला पैशात समाधान दिसते. कुणाला अमुक व्यक्ती मिळावी. तर कुणी प्रसिद्धीत आनंदी होते. तर कुणी वस्तूत समाधान शोधते. मी ज्यावेळी नोकरीच्या शोधात पुणे पिंपरी चिंचवड परिसर आलो. त्यावेळी मासिक पाच हजार हे माझे ध्येय होते. दुसऱ्याच महिन्यात दहा हजाराची नोकरी मिळाली. आता लाखभर रुपयांचे देखील कौतुक वाटत नाही! सुखाची नेमकी व्याख्या काय करावी?

गेल्या काही काळात कुणी सुखी आहे हेच मला दिसलंच नाही. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या दुःखात. कुठल्या ना कुठल्या ताणात. बर हा त्रयस्थ व्यक्ती म्हणून अकारण वाटावा असा. पण त्यांच्यासाठी ते महत्वाचे. बर आपण अशा समाजात राहतो. तिथं सल्ले फुकटात मिळतात. त्यामुळे स्वतःहून सल्ला घेणे हा विषयच नाही. त्यात प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. त्यामुळे, त्यांनाही दोष देण्यात काही अर्थ नाही.

कुटुंब इतकी अंगवळणी पडलेली गोष्ट. त्यामुळे ती एक संस्था आहे, ह्याचाच विसर पडतो. अहमिकेपायी अकारण ताण घरोघरी. कुणीच माघार घेत नाही. दुसरी बाजू समजून घेण्याची क्षमता सर्वांचीच संपली. पडती बाजू हेही दुःखाचं कारण झालंय. काहीजण तर शब्द देखील पकडतात. अन प्रत्येकात नसलेलं दुःख जन्माला घालतात. हेखेखोर नाहीत असे मला म्हणायचे नाही. मुद्दा इतकाच त्यामुळे मिळालेल्या यशाचा देखील आनंद घेता येत नाही.

व्यावसायिकांनी तर सुख म्हणजे वस्तू खरेदी अशी व्याख्या केली आहे. अगदी लहानशा चॉकलेटपासून ते आलिशान घरापर्यंत सगळ्याच गोष्टी म्हणजे आनंद असा समज पसरलेला आहे. शालेय शिक्षणात प्रगतीपुस्तकाच्या अंकात सुख शोधणारे देखील कोट्यवधी आहेत. बर यश मिळवण्याची भूक देखील अमर्याद. त्यामुळे मिळालेले यश देखील तात्कालिक.

माझ्यामते सुख ही आनंदाची आंतरिक भावना. आपण बाह्यजगात शोधतो आणि अधिकच दु:खी होतो. बाहेर सापडणारच नाही. सुख म्हणजे हवं ते मिळणे. पण अनेकदा इच्छा वाढत जातात. त्यात यशापशय असते. दुःख त्रास ताण येतो. काहीजण ह्या गोष्टींमध्ये इतके गुंततात की, मिळालेल्या गोष्टींचे ते सुख उपभोगत नाहीत! अन मग सगळं मिळून देखील समाधान मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या यशाचा आनंद घेणे. त्यातूनच पूर्णत्वाची अन सुखाची अनुभूती येते. नाहीतर सुखाच्या नादात दुःखाचे डोंगर ओलांडून देखील समाधान आनंद मिळणार नाही. तूर्तास इतकेच.