सहनशक्ती ही मोठी शक्ती आहे. परंतु, याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. उलट अपमान सहन करणे म्हणजे भित्रा असा शिक्का मारला जातो. अनेकदा अनेक कारणांनी त्रास होतो. सर्वांनाच कमीअधिक अनुभव येतो. ज्याला यश मिळवायचे त्यांना मात्र याची नितांत गरज आहे.
कोणीतरी काहीतरी बोलतो. कधीकधी अपघात होतो. वा कोणीतरी आपला अपमान करतो. अशा सर्व प्रसंगात सहनशक्ती कामाला येते. त्यावेळी राग येणे, त्रास होणे साहजिक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करता येणे वा ते सहन करण्याची क्षमता असणे हे चांगले लक्षण आहे. वेळ कधीही सारखी नसते. आज जो रंक आहे तो उद्या राजा होऊ शकतो. अन आजचा राजा उद्या रंक देखील होऊ शकतो. त्यामुळे अनेकदा अनेकांकडून अपशब्द उच्चारले जातात. अपशब्द विषाप्रमाणे असतात. परिणाम देखील तसेच होतात.
राग हा माणसाला राक्षस बनवतो. अन राक्षसाला बुद्धी नसते. सूड भावनेने केलेले कार्य कधीही हितकारक नसते. ह्याचा अर्थ माघार घेणे असा होत नाही. परंतु, रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेकदा समोरच्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. तो माफी देखील मागतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ह्या जगात आर्थिक श्रीमंतीला महत्व दिले जाते. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या थोडेफार जरी वरखाली झाला तर जग तुमच्याकडे तुच्छतेने पाहते. दुर्लक्ष करते.
अशावेळी तुम्ही स्वतःचा संयम ठेवला तर भविष्यात नक्कीच याचा फायदा होतो. कारण मारलेलं एकवेळ विसरणे शक्य आहे पण बोललेलं विसरले जात नाही. ह्याने विनाकारण शत्रू निर्मिती होते. त्याऐवजी स्वतःच्या सुधारणांकडे लक्ष देणे महत्वाचे. खरतर एक वयाच्या एक ठराविक एका टप्प्यानंतर ह्याची जाणीव होतेच. तापट व्यक्ती दुसऱ्यासोबत स्वतःचे देखील अहित करते. कारण त्यात सहनशक्ती नसते.
मराठी लोकांमध्ये शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेमुळे अपमान सहन करण्याची वृत्ती नाही. रामदास स्वामींनीच म्हटलेलं आहे, “ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥” ह्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. पण प्रत्येक ठिकाणी शक्तीच कमी येते असे नाही. युक्ती देखील उपयोगी ठरते. त्यामुळे आपले स्वहित पाहण्याकडे आपला कल असावा.
मना करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हेही खरे. परिस्थिती अनुकूल असेल तर त्याची प्रगती होते. स्वामी विवेकानंदाचे मन आणि त्याची शक्ती अशा नावाचे लहानसे पुस्तक देखील आहे. ते आपण युट्युबवर ऐकू देखील शकता.
शिवरायांनी तह केले. शत्रूला जाळ्यात ओढण्यासाठी घाबरले असे चित्र निर्माण केले. परंतु हे सर्व स्वराज्याच्या हितासाठी केले. बाजीराव तर जोवर सर्व परिस्थितीत आपला विजय होईल अशी खात्री होत नाही तोवर प्रत्यक्ष युद्धाला सुरवात देखील करीत नसे. त्यामुळेच तोही छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे जगातील अजेय योद्धा ठरला. त्यामुळे वाक्यार्थ घेण्याऐवजी लक्षार्थ घ्यावा. त्यातच आपले हित आहे. तूर्तास इतकेच.