अपघात

आज संध्याकाळी आठच्या लोणावळा लोकलने मी येत असताना गाडी फारच थांबत थांबत येत होती. दापोडीच्या पुलावर तर दहा मिनिटे थांबली. आता पुण्यातील लोकल कुठेही आणि कधीही थांबतात. आता एका वर्षानंतर मला देखील सवय झाली आहे. लोकल दापोडीहून निघून कासारवाडीला आली. जेव्हा कासारवाडीहून लोकल निघाली तर फलाटाच्या शेवटी दोन पोलीस उभे होते. अंधार असल्याने त्यातील एक पोलीस हातात एक मोठी बैटरी घेवून उभा होता. त्या फलाटावर एक प्रेत होते. बघूनच समजून गेलो. त्याच्या शरीरावर कापड टाकलेले होते. तरी मधील भाग खोलगट दिसत होता. लोकलला एवढा उशीर का झाला हे सुद्धा समजले. बहुतेक सातच्या नंतर सुटणाऱ्या एक्स्प्रेसने उडवले असावे.

या महिन्यातील माझ्या माहितीतील ही दुसरी घटना आहे. मागच्या आठवड्यात सकाळी सकाळी एकाचे अर्धे शरीर म्हणजे कमरेपर्यंतचा भाग शिवाजीनगर स्टेशनच्या अलीकडे साधारणत: एक किलोमीटर आधी रुळावर पडलेला होता. मागच्या महिन्यात मला आठवते मी एक असेच प्रेत खडकी स्टेशनला पहिले होते. बघून अख्खा दिवस उदास गेला होता. मला काही पाहण्याची हौस नव्हती. पण ते फलाटावर ठेवले होते. आणि मी लोकलच्या गेटवर. त्यात इंद्रायणी एक्स्प्रेससाठी लोकल खडकीला थांबलेली. हे आजकाल खूप घडते आहे. दोन महिन्यापूर्वी मी असेच दोन अपघात आकुर्डी स्टेशनच्या बाजूला बघितले आहेत. एकदा क्रोसिंग करताना उडविले. त्या मुलाला त्याची आईच अस प्रेत बघून काय कराव आणि काही नको अस झाल होत. मला ते पाहून खरच नको नको झाल होत. दोघेही बहुतेक स्टेशनवर येण्यासाठी रुळावरून येत होते तर एक्स्प्रेस आली. हा वाचला पण आई गेली. मी त्यादिवशी जेवण केलाच नाही. खर तर अन्नाची वासनाच उडून गेली होती. घरी आल्या आल्या आईवर चिडलो होतो, रुळावरून जायचं नाही म्हणून. ती म्हणाली मी अजूनपर्यंत कधी गेलेच नाही. मग मलाच कस तरी वाटल. उगाचच काही कारण नसताना चिडलो.

अपघात वाढण्याचं खर कारण आहे स्टेशनच्या बाजूला वाढलेल्या झोपडपट्ट्या. मागच्या वर्षभरात मी पुण्यात कुठ काही विकास झाला हे पहिलाच नाही. महागाई आणि झोपडपट्ट्या हे दोनच गोष्टी वाढल्या. प्रत्येक पुण्यातील स्टेशनच्या बाजूला एक मोठी झोपडपट्टी आहेच. त्यातली लोक सकाळी सकाळी रुळावर शौचालयाला बसतात. त्यांची मुल स्टेशनवर खेळ खेळताना मी रोज बघतो. पुणे स्टेशनमध्ये तर मागच्या दोन महिन्यात किती भिकारी वाढलेत. पण कोण लक्ष देणार? दादा केवळ जमिनीच्या व्यवहारात. आणि भाई क्रीडा क्रीडा करत बसतात. मुंबई आणि पुण्यात फरक फ़क़्त नावाचा आहे. बाकी झोपड्यांच्या बाबतीत आणि अपघातांच्या बाबतीत पुणे मुंबईला मागे टाकील यात शंका नाही. याचा विचार इथले नेते करण्याच्या फंदात पडत नाहीत. राष्ट्रवादीच्या यशाचं गमक हेच आहे बहुतेक. मागील आठवड्यात एक तरुण आणि एक चिमुकला पीएमपीएलने चिरडला. बाकी काहीही म्हणा, या बातम्यांकडे कोणीही गांभीर्याने बघत नाही. त्याच कारण पण तसच आहे. ती एक म्हण आहे न ‘रोजचच मढ त्याला कोण रड’. तसच झालं बहुतेक.

Leave a Reply