आकारमान

काय सांगू गेल्या वर्षभरात स्वतःकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे माझे वस्तुमान आणि आकारमान खुपंच वाढले. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मित्रांचा ‘माझे आकारमान’ हा आवडता विषय होऊन गेला आहे. माझी मैत्रीण देखील माझी याच विषयावरून खेचायची. आणि खेचता खेचता तीचे देखील ‘आकारमान’ वाढले होते. पण ती पाहिल्या प्रमाणे झाली आहे. मी मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये वजन केले तेव्हा ६४ किलो होते. या एप्रिलमध्ये केले तेव्हा ७५ किलो झाले. माझे मित्र वस्तुमान बघून दिसत नसलेले पोट धरून हसत होते.

असो, कोकणात गेलो असतांना ते परशुराम गाव उंचावर आणि चिपळूण खाली असे आहे. जायला एक पोफळी आहे. म्हणजे दगडांची पायवाट. काही काम असेल तर मी नेहमी त्याचाच वापर करतो. यावेळी गेलो होतो तर चिपळूणला जातांना आणि पुन्हा परशुराम येतांना खूप त्रास झाला. त्यावेळी आपले वस्तुमान खुपंच वाढले याचा आभास झाला. आणि आकारमान बद्दल काही बोलू नका. आजकाल कंपनीतील मित्र मला ‘गुटगुटीत’, ‘सुदृढ बालक’, ‘भैरू’, ‘बबलू’ अशा विविध नावांनी हाक मारतात. धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. तसे मी आकारमान कमी करण्यासाठी रोज पहाटे उठून धावण्याचा संकल्प करतो. पण मी जेव्हा उठतो. तेंव्हा सकाळचे आठ वाजलेले असतात.

मग मी घरीच आपला ‘जोर’ वर जरा जास्तच जोर देत आहे. पण त्यात पोटाचा कमी आणि छाती, दंडाचा जास्त व्यायाम होतो आहे. त्याचा थोडा फरक पडला आहे. म्हणजे याच महिन्यात वजन केले तर न विकास आणि अधोगती. म्हणजे अजूनही वजन ७५ किलो आहे. पण वस्तुमान न कळण्याची गोष्ट आहे. पण ‘आकारमान’ लगेचचं दिसून येते. म्हणजे मी अजून ‘गडकरी’ किंवा ‘गवार’ तरी झालेलो नाही. पण होईल याची भीती वाटते आहे. बर जिम इतक्या महाग आहेत. आणि जरी लावली तरी मला वेळ कधी मिळणार? माझ्या मित्राच्या साखरपुड्याला गेलो होतो. तर त्याची आई ‘पुणे मानवले म्हणायचे’ अस म्हणाली. मागील आठवड्यात संगमनेरला कॉलेजला गेलो होतो. येतांना माझ्या जुन्या मित्रांना फोन लावला. भेटूया म्हणून बोलावलं. आल्यावर मला त्याने ओळखलंच नाही. आता पाच वर्षानंतर भेटलो. पण माझा ‘आकारमान’ पाहून तो ‘सुधारला’ असा शेरा मारला. तो आहे तसाच ‘पहिलवान’ म्हणजे काडी ‘पहिलवान’.

माझ्या कंपनीतील एका ‘बॉडी बिल्डर’ला काय करू म्हणून विचारले तर तो बोलला की ‘स्टमक’ मारत जा. आता गेल्या दोन दिवसांपासून ते देखील सुरु केले आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही. माझे रोज किमान दीड ते दोन किलोमीटर चालणे होते. आजकाल त्या ‘लिफ्टची’ सुद्धा लिफ्ट घेत नाही. येजा करण्यासाठी पाहिर्यांचा वापर करतो. पण ‘आकारमान’ कमी काही होत नाही. किती दिवस अस ‘पेक्षा अधिक’ राहावे लागणार देव जाणे. आता खाण्यावर सुद्धा कंट्रोल ठेवत आहे. तेलकट, तुपकट पदार्थ बंदच केले आहेत. म्हणजे तसे बंदच होते. पण आता काटेकोरपणे पाळत आहे. मला वाटते ‘चिंता’ हा प्रकार बंदच झाल्याने अस होते आहे की काय? काय करावं??

Leave a Reply