आम्ही त्यांना ‘विठ्ठल’ म्हणतो. आणि ते आम्हाला ‘घरफोड्या’. आम्ही ‘परप्रांतीयांना’ विरोध करतो. आणि ते ‘आम्हाला’. आम्ही ‘अबू’ची अब्रू काढतो. आणि ते ‘आमची’. ते ‘चिमण्यांनो घरी या’ अस आवाहन करतात. आम्ही त्यांच्या दर्शनाला जातो. आणि ते आम्हाला ‘बाटगे’ म्हणून गेटवरूनच हाकलतात. पण उपमुख्यमंत्री त्यांना ‘पाहुणे’. आम्ही अंबरनाथला त्यांना पाठींबा दिला तर, काहीच ‘नसे’. पण विधानपरिषदेत त्यांच्या विरोधात मतदान केल तर ‘धनसे’. त्यांचा तो ‘पॅटर्न’ आणि आमचा ‘चोखोबार’. त्यांचे ते मराठी ‘प्रेम’. आणि आमचे ते ‘लफडे’. आम्ही त्यांना ‘वाघ’ म्हणतो. आणि ते आम्हाला ‘पिल्लू’ म्हणतात. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले तर ‘साटेलोटे’. आणि त्यांनी कृषीमंत्र्यांना भेटले तर ‘सदिच्छा भेट’. ते स्वतः महाराष्ट्रातील मराठी लोकाची दयनीय अवस्था पाहून ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गरज काय?’ अशी भूमिका मांडतात. आम्ही त्यांच्या सुरात सूर मिसळतो. पण त्यांचाच पक्ष त्यांची ही भूमिका ‘व्यक्तिगत’ आहे अस म्हणतो.
त्यांच्या विरोधात वॉरन्ट निघाला तर आम्ही ‘कसा येतो बघूच’ अशी भूमिका घेतो. आणि त्यांचा पक्ष ‘कायद्याचा मान राखू’ अशी भूमिका घेतो. ते आम्हाला हवं तसे बोलतात. हवे तसे ‘वार’ करतात. आणि आम्ही बोलालो तर आम्ही ‘वार करी’. आम्ही ‘छटपूजे’च्या विरोधात ‘हटपूजा’ सुरु करतो. आणि त्यांचा पक्ष, पक्ष कार्यालयातच भोजपुरी गाण्यांचा ‘कार्यक्रम’ ठेवतो. हे सर्व असूनही आम्ही त्यांना ‘आदर्श’च मानतो. आणि ते हे सर्व पाहूनही आम्हाला ‘नालायक’ मानतात. त्यांचे प्रत्येक वागणे आम्ही ‘बरोबर’ आहे अस म्हणतो. आणि आमच्या प्रत्येक वागण्याला ते ‘चुकीचे’ म्हणतात. त्यांचा तो ‘महाराज’. आणि आमचा तो ‘मूषकराज’. त्यांची प्रत्येक गोष्ट ती स्टाईल. आणि आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट ‘कॉपी’. आम्ही त्यांना ‘आपले’ म्हणतो. आणि ते आम्हाला ‘शत्रू’.
Leave a Reply