आज किती छान दिसते आहे. मला ना आजकाल दुसरे काहीच सुचत नाही आहे. कालही असेच, तिच्याशी बोलायचे म्हणून कंपनीच्या इमारतीच्या तीन मजले पळत आलो. आणि आज सकाळी पळायला गेलो तेव्हा इतके पाय ठणकायला लागले ना! पण काही नाही, व्यायाम करतांना तिचा चेहरा आठवला आणि दुखायचे बंद. दाढी करतांना दोन तीन ठिकाणी कापलं. पण लक्षात आले नाही. बसमध्ये बसल्यावर एका मित्राने सांगितल्यावर लक्षात आले.
काल माझ्या सिनिअर सोबत बोलतांना देखील असेच. ती मला सांगत होती की, तिला काम द्यायला आठवडा लागेल. आणि मी तिला हसून ‘चालेल’ असे म्हणत होतो. ती देखील माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. मुळात माझे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. जातांना मी माझ्या सिनिअरला सांगावे म्हणून तिच्या डेस्कवर गेलो. त्यावेळी ती माझ्याशी का बोलत नाही म्हणून बाजूला बघितले तर, क्ल्यायंट तिच्या सोबत. मग मलाच माझे बेकार वाटले. काय मूर्खपणा चालू आहे. काल आई आली. नेहमीप्रमाणे आज एक स्थळ बघायला जायचे आहे. आज वडील येतील. त्यांच्या समाधानासाठी मी जाणार.
काल मला आई तेच सांगत होती. आणि मी तिला सरळ ‘मला एखादी कंपनीतील आवडली तर तुम्हाला सांगेल. माझ्या लग्नाची घाई करू नका’. नंतर खूप वेळाने माझ्या मी काय बोललो ते लक्षात आले. आईच्या लक्षात नाही आले. पण वडिलांना आई सांगेल त्यावेळी त्यांना मला नक्की काय अर्थ आहे हे कळून जाईल. पण काय करू मी? तिला पाहिल्यापासून मला काहीच सुचत नाही आहे. काल माझ्या या ब्लॉगवर उजव्या बाजूला असलेल्या गुगल आयकॉनवरून माझ्याशी मी ऑनलाईन असतांना कोणीही गप्पा मारू शकते. काल एक जण आला. आणि त्याने ‘हाय’ केल्यावर त्याला प्रत्युतर म्हणून त्या विंडोत क्लिक करण्याएवजी उजव्या बाजूला असलेल्या क्लोज बटनावर क्लिक केले. आणि ती विंडो बंद झाल्यावर लक्षात आले, काय घडले ते! खरच यार चुकून घडले ते! मुद्दाम नाही केल. तुमच्यापैकी कोणी आला असेल तर, मनापासून आणि हात जोडून माफी मागतो. खरच खूप काही गोंधळ चालू आहे. आणि आजकाल ती सोडून दुसरे काहीच करण्याची इच्छाच होत नाही आहे. ती समोर आली की, तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नाही.
आजही ‘हाय’ करण्याची इच्छा मनापासून होत आहे. पण पुन्हा हिम्मत होत नाही आहे. काल, चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिरात गेलो होतो. बाजूचे सिमंत पेढेवाल्याचे दुकान बंद. म्हणून चांगले पेढे कुठे मिळतात यासाठी बहिणाबाईला फोन केला. पण मग तिने पेढे कशासाठी म्हणून विचारल्यावर गोची झाली. परवा मंदिरात जातांना इच्छा झाली की, तिच्याशी बोललो तर पेढे घेऊन दर्शनाला येईल. मग कशाला उगाचच ना! बोललो तर करायला हवे ना! घरी गेल्यावर आईने देखील तोच प्रश्न केला. मग तिला ‘संकष्टी’ला जायला जमले नाही. म्हणून गेलो. आणि मोकळ्या हातांनी कसे जायचे?’ अस थातूर माथुर सांगून मोकळा झालो. काल दुपारी कंपनीत असलेल्या एटीएम मध्ये गेलो. आणि दहा एक मिनिटे कोणते कार्ड वापरावे, काही सुचेच ना! असो, इति ‘अप्सरा’ कृपा!
Leave a Reply