कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारत सरकारवर केलेले आरोप अनेकांसाठी धक्कादायक आहे. मुळापाशी गेलात तर हे कशासाठी तर मतांसाठी आहे हे लक्षात येईल. भारत सरकारला देखील असे आरोप हवेच. यात दोन देशांचे हित नसले तरी दोन पुढाऱ्यांचे हित नक्कीच आहे.
हरदीपसिंह निजेर नामक खलिस्थानी अतिरेक्याची हत्या कॅनडात झाली. त्यामागे भारत सरकारचा हात आहे, असा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या लोकसभेत केला. परकीय सरकारकडून आमच्या नागरिकाची हत्या हा आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे वगैरे बोलले. बाहेर आल्यावर पत्रकारांशी बोलतांना आम्हाला या विषयाचे गांभीर्याची जाणीव भारत सरकारला करून द्यायची आहे. असे म्हणाले. पत्रकारांनी पुरावे मागितले. त्यावर त्यांनी हे गोपनीय आहे वगैरे म्हणाले. महागाईचा प्रश्न विचारल्यावर त्यांनी अक्षरशः पळ काढला.
गंमत आहे नाही? अगदी याच प्रश्नावर भारतातील सरकार देखील पळ काढते. कॅनडाच्या येत्या २०२५ सालात तेथील लोकसभेच्या निवडणुका आहेत. अन भारताप्रमाणे तिथेही सगळं निराशेचे वातावरण आहे. त्यात सध्यस्थितीत पंतप्रधानांना भारतातून गेलेल्या शीख समुदायाचा पाठिंबा आहे. सगळेच शीख खलिस्तानवादी नाहीत. परंतु, राष्ट्रवादाचा मुद्दा हा भावनिक असल्याने अनेकांना तो भावतो. त्यामुळे मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. गंमत म्हणजे कॅनडाच्या विरोधी पक्ष नेत्याने देखील पुरावे द्यावे अशी मागणी केली आहे.
आपल्याकडे मात्र शक्य तेवढे भांडवल करण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. यातून त्यांना आपल्या राष्ट्रवादी मतपेढीला खेचण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्ही केलं नाही म्हणायचं. अन दुसरीकडे, बघा आम्ही इतके शक्तिशाली आहोत की दुसऱ्या देशाचा पंतप्रधान आमच्यावर आरोप करतोय, हे बिंबवायचे. ह्यातून तिकडे ट्रूडू अन इकडे मोदीभाऊ आपण कसे राष्ट्रहित साधतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
याआधी दोन कॅनडाच्या नागरिकांची चीन सरकारने हत्या केलेली. त्यावर ट्रूडू यांनी आजवर कधी ब्र देखील काढला नाही. आता तिकडे कॅनडात एका व्यक्तीची हत्या होते. तीन महिन्यात एकाही आरोपीला अटक होत नाही. अन हे बाबा जाहीरपणे दुसऱ्या देशाला आरोपी म्हणतात. हे अगदी आपल्याप्रमाणे आहे. पुलावामात सैन्यावर हल्ला झाला. ४० सैनिक ठार मारले. आपल्या सरकारने याची चौकशी देखील केली नाही. उलटपक्षी आम्ही पाकिस्तानात घुसून अतिरेकी तळावर हल्ला करून २०० अतिरेकी मारले अशा बातम्या छापून आणल्या.
अशा हल्ल्याचा पुरावा मागितल्यावर सत्ताधाऱ्यांनी सैन्यावर अविश्वास का दाखवता असा उलट प्रश्न करून वेळ मारून नेली. हवाई सैन्य दल प्रमुखांनी आम्हाला दिलेल्या ठिकाणावर आम्ही हल्ला केला. किती मारले गेले हे मोजणे आमचे काम नाही म्हटले. मग २०० अतिरेकी मारले ही बातमी कुठून आली. तर ही बातमी पसरवण्याचं काम खुद्द गृहमंत्र्याने केलेलं. चीनने अर्धा लडाख गिळंकृत केला. वीस सैनिकांचा बळी घेतला. त्यावर साधी चर्चा देखील लोकसभेत न करणारे कॅनडाच्या आरोपात थयथयाट करीत आहे.
२०२४ ला भारतात आणि २०२५ ला कॅनडात लोकसभेच्या निवडणुका आहेत. अन त्यासाठी दोन्ही देशातील राष्ट्रवादी मंडळींना आपल्या बाजूने खेचण्याचा निव्वळ डाव आहे. काही दिवसांपूर्वी, तेथील एका राज्यातील देवाणघेवाण विभागाच्या मंत्र्याने (आपल्याकडे कृषीमंत्रालय हा विभाग सांभाळते) ट्रूडू सरकारने अकारण कसे भारताशी वाद निर्माण केले आहेत. यावर दाखल्यांसहित आरोप केलेले.
थोडक्यात कशासाठी तर मतांसाठी हा संदर्भ घ्यावा. कारण दोन्ही देशातील सत्ताधाऱ्यांना महागाईसारख्या प्रश्नांना तोंड देता आलेले नाही. तिकडे अन इकडे अनेक प्रश्नांवर तोंडावर आपटल्यावर फक्त नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची चाल आहे! तूर्तास इतकेच.
Leave a Reply