बोला, जय बंदी! आजींचा कालचा लाल किल्ल्यावरील तो सोहळा पाहिला आणि डोळ्याचे पारणे फिटले. आता मला जाम विश्वास बसला आहे की, कायदा कोणीही ‘हातात’ घेऊ शकत नाही. काय ते भाषण आणि काय ते संचलन. आजींचे भाषण मी मन लावून नेहमीच ऐकतो. काय गडकरी साहेब? तुम्ही काय फडतूस विषय घेता. म्हणे तिरंगा फडकवणार लाल चौकात. कळल न! आता पुन्हा असला वेडेपणा करू नका. तस् म्हटलं तर मी तुमच्या पक्षाला कधीच मतदान करीत नाही. परंतु, यावेळी मात्र मुद्दा चुकीचा होता, म्हणून बोलतो आहे. काय गरज होती तिरंगा फडकावयाची? आणि फडकून काय मिळणार होत?
त्यापेक्षा मला विचारलं असते तर मी तुम्हाला ‘पाक’ झेंडा लाल चौकात फडकवा अस म्हटलं असत. आणि मग कोणीच रोखले नसते. पहा आधीच तिरंगा फडकावून देशद्रोह करता. आणि अडवलं की चीडचीड करता. देशाचा हाच ‘कायदा’ आहे. आणि सध्याच्या घटनेत हेच शिकवलं. भारतरत्न बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आजकाल कुठे चालते? तस् असत तर कसाब नसता का सुळावर चढला? काहीतरीच आपल! हो! मी मस्करी कशाला करील? मला सांगा, अरुंधती मॅडमने मध्यंतरी त्यांच्या ‘दिव्य’ वाणीतून नाही का काश्मीर भारताचा भाग कधीच नव्हता अस म्हटलेलं. मग आपल्या प्रिय सरकारने त्यांना काय केल? नाही ना. पहा अस वागले की कायद्याचे पालन केले अस म्हणतात. मला त्यावेळी नव्हते पटलेल.
पण कालच ते सरकारने केलेले कृत्य पाहून विश्वास बसला आहे. खरच आपण काश्मीरवर अतिक्रमण केल आहे. उद्या जावून अरुणाचल प्रदेशात माओवादी जास्त झाले किंवा ते आम्ही चीनी आहे अस म्हणू लागले की तिथेही तिरंगा ऐवजी पिवळा ड्रॅगनवाला झेंडा फडकवल्यावर कोणतीही शिक्षा होणार नाही. किंवा तिथे गडकरी साहेब, झोपू नका! लक्ष द्या. तिथ तुम्ही तिरंगा फडकावयाची इच्छा केल्यास तिथेही हेच घडेल. याला म्हणतात खरा न्याय. मला तर आपले सोनियाचे राज्य रामराज्याच्याही पेक्षा अधिक योग्य आणि न्यायप्रधान वाटते आहे. तर मग साहेब, माझ्यामागे मोठ्याने म्हणा, ‘यु आर माय सोनिया’. साहेब तुम्हा लोकांच्या भाषेत ‘सर्वे संतु निरामया’ अस काहीस म्हणतात. संत लोक म्हणूनच गेलेत की, हे लोक एक मोहमाया आहे.
त्यामुळे साहेब, आता फक्त एकच करा. म्हणजे शांत बसा. बाकीच बघायला आहेच की सरकार! सरकार लवकरच काळ्या पैशाचा हिशोब देणार आहे. आणि स्वीस बँकेत कोणाकोणाचे किती किती रकमा पडून आहेत. ही माहिती देणार आहे. खर तर राजीव ‘बंदी’ यांचे दीड हजार कोटी डॉलर पडून आहेत अस मध्यंतरी जेठमलानी साहेब म्हणाले. चला कशाला जुने विषय उगाळू. सरकारच काम आहे ते. तर मग गडकरी साहेब, पुन्हा अस देशद्रोही कृत्य करू नका. हव तर भ्रष्ट्राचार करा. हव तर एखाद्या व्यक्तीला जिवंत जाळून टाका. पण हे असले कृत्य करू नका. धान्य सडते किंवा फाशी कोणाला नाही द्यायची हे काम सरकार ठरवणार. कारण ते कायद्याने गुन्हा ठरत नाही. तुम्ही किंवा सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार नाही. लवासा असो की आदर्श दोन्ही कायद्याप्रमाणेच आहेत. परंतु तिरंगा झेंडा फडकवणे म्हणजे देशद्रोह आहे. त्यावर बंदी असेल. सरकारला जे पटेल तो कायदा आणि जे नाही आवडणार त्यावर बंदी. मग बोला साहेब, जय बंदी!
Leave a Reply