जय बिहार

बस अजून काही दिवस, मग हेच ‘जय बिहार’ म्हणावे लागेल. नाहीतरी ‘जय’ बिहारकडेच उरला आहे. आमच्याकडील ‘यशवंतांना’ जिवंत जाळले जाते. एका व्यक्तीला भर दिवसा जिवंत जाळले जाते. मारणारा कोण? ज्याला तडीपार केले आहे तो. पुण्यात महिन्याकाठी एक तरी रेप केस होते. तिथेही गुन्हेगाराची बाजू कोण घेत? तर आमचे माननीय आमदार साहेब. तडीपारी रद्द करायला डायरेक्ट मंत्रालयापर्यंत मजल. आमचे मुख्यमंत्री ‘आदर्श’ निर्माण करतात. कृषिमंत्री वाईन गाळत बसतात. ‘जातिवंत’ उपमुख्यमंत्री जमिनींचे व्यवहार करतात. नदीत आणि ओढ्यात भर टाकून जमिनी विकतात.

कॉमनवेल्थ गेम्सचा खादाडी इथे झेंडावंदन करून राजकीय भाषण ठोकतो. लवासा सारख नवीन अनधिकृत शहर कृषिमंत्री वसवतो. न्यायालयाने दिलेला ‘काम बंद’चा निर्णय जुमानत नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर आमचा राज्यात ‘एक आमदार आणि किमान एक घोटाळा’ अस सूत्र आहे. आणि प्रशासन लाच उर्फ त्यांचा घटनेने दिलेल्या हक्काशिवाय काही बोलत नाही. आंदोलन होतात पण पुतळा हटवा यासाठी, विकासाचा एकही मुद्दा नाही. मुळात विकास होतो. माझ्या घरासमोरील रस्ता दोन वर्षात सहावेळा डांबरीकरण केले गेले. एकच रस्ता सहा वेळा डांबरीकरण. एका आमदाराला वर्षाला एक कोटी निधी. त्यात तो वीस टक्के कमिशन घेतो. आणि शेजारचा गुजरात. काय बोलायचं? भारत आणि गुजरात या दोन भिन्न गोष्टी आहेत. जरी गुजरात भारतात असले तरी.

त्यांची एक एक्स्पोची गुंतवणुकीची रक्कम भारताच्या अर्थसंकल्पाच्या एक तृतियांश, एवढी मोठी. आणि आमचा राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे नुसतेच ‘पॅकेज’. अमुक हजार कोटी, तमुक हजार कोटी. आकडे पण असे की उच्चाराने देखील मुश्कील. पण नुसतेच पॅकेज. मिळतो काय ‘घंटा’. वीज नाही. पाण्यावर तर न बोललेलं बर. नोकऱ्या देखील नाहीत. पण तरीही ‘जय महाराष्ट्र’. कशाचा ‘जय’ करायचा? काय आहे त्याचा ‘जय’ करायचा. इथे फक्त ‘भ्रष्टाचार’. त्या डेक्कन बस स्थानकासमोरील पीएमपीएमएलची राखीव जागा एका बिल्डरला ‘गिफ्ट’ दिली. फार जुनी गोष्ट नाही, आठवडा झाला. नुसत आपल दादा आणि भाई. साल, राज्याची अब्रू लुटली तरी आहेच उदो उदो. आणि आम्ही शिव्या घालतो त्या ‘भय्यांना’.

त्यांच्याच नितीश भय्याने बिहार. नावातच ‘हार’. पण तिकडे सगळीकडेच ‘जय’. अजून गावागावात वीज नाही. परंतु पोहचेल याचा विश्वास. रस्ते अजूनही एकदम चांगले नाहीत. परंतु पक्के आणि चांगले रस्ते होतील. सगळे दादा, भाय जेलमध्ये सडत आहेत. चाळीस हजार गुंडांना शिक्षा. आणि आम्ही पोसतो आहे त्या कसाबला. मुख्यमंत्री काय, उपमुख्यमंत्री काय, तो विरोधी पक्षनेता काय जावून त्याचे ‘पापे’ घेऊन येतात. आमचा गृह राज्यमंत्री चपला उचलतो. महसूलमंत्री आणि त्याचा ‘स्वाभिमान’ गुंडगिरी करते. पण एकही केस दाखल होत नाही. त्या बिहारने आमदार निधी बंद केला. शाळेतल्या मुलींना फुकट सायकली वाटल्या. गुजरात नंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारे राज्य. तिकडे अजूनही रात्री मुलींना घराबाहेर पडणे मुश्कील. आणि आमच्या इथे, दिवसाढवळ्या. सर्वांसमोर हल्ले काय, अत्याचार काय. एकदा नीट उप मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे निरखून पहा. डोळे कसे, जणू आताच दारू ढोसून आला आहे. बोलणे देखील तसेच. भाषण करतो की धमक्या देतो हेच कळत नाहीत. आणि नजर कशी तर वासनेने भरलेली.

मुख्यमंत्रीकडे पाहिले तर, राज ठाकरे बोलला तेच. साठीच्या दशकातील व्हिलन. ‘पाखरू’ आणि ‘वाडा’. सोडा, त्या बिहारमध्ये आपल्या राज्यापेक्षा गुन्हे कमी, रोजगार जास्त. दंगली देखील कमी. दरवर्षी नद्यांच्या प्रकोपाने त्यांना नुकसान सहन करावे लागते. पण तरीही ते विकास करू शकतात. आणि आमचे राज्य नुकसान होवो अथवा हल्ला. राज्यात पोलिसांना ठेचून मारले जाते. मुंबई हल्ल्यातील एकाही शहीद पोलिसाच्या घरी अजून मदत मिळालेली नाही. दहा हजाराच्या आपसापास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण आमचा कृषिमंत्री आयपीएलचे घोटाळे करण्यात मग्न. आणि तिकडे बिहारमध्ये विकासाचा मंद उष:काल. आणि आमच्या इथे भ्रष्टाचाराचा आणि गुन्ह्यांचा काळाकुट्ट अंधार.

सोडा, आपल्याच राज्याची आणि आपल्याच लोकांची स्तुती करेल तेवढे कमी आहे. कट्टर मराठी आणि परप्रांतीयांचा द्वेषी असून देखील आनंदाने बोलावस वाटत आहे ‘जय बिहार’.

Leave a Reply