माझ्या डेस्कसमोरील खिडकी नामक ‘टीव्हीतून’ अनेक वाहिन्यांचे दुरून दर्शन घेत असतो. कधीही पहा, एकानंतर एक कार्यक्रम अखंड चालूच असतात. ज्यावेळी मी कामातून उबतो. त्यावेळी त्या टीव्हीवरील ते दूरदर्शन पहाण्याचे सुरु करतो. अनेकदा दुपारच्या वेळी ‘घडलं बिघडलं’ चालू असते. म्हणजे कदाचित कावळ्यांच्या कॉलेजात काहीतरी आधीच घडले असते. आणि त्यावरून चार चौघे, म्हणजे काही कावळे आणि तितक्याच कावळिणी हसत खिदळत संवाद साधत असतात. कधीकधी त्यांची तिथेच मस्ती सुरु असते.
आता हे दूरदर्शन असल्याने आवाजाची क्लीअरिटी चांगली नसते. त्यात कधी कधी दोनच पात्र उर्फ ‘कबुतरे’ असतील तर त्यांचा प्रणयच चालू असतो. म्हणजे त्यांना पाहून आयुष्यात काहीच केले नसल्याची जाणीव आहे. मग गेले पंचवीस वर्षात आपण काय केले हा प्रश्न पडतो. दुख: वाढू नये म्हणून संगणकाच्या स्क्रीनमध्ये डोके घुसडावे लागते. कधी कधी तर ते एम टीव्हीच्या आणि खुपदा ‘फॅशन टीव्ही’ चालू असल्याचा भास होतो. काय बोलू त्या सृष्टीच्या विविधतेबद्दल. काय वर्णन करू त्यांचे! नको, एकदम ‘इलू इलू’ होते. आता चुक्नही हे ‘इलू काय आहे?’ अस विचारू नका. खर तर माझ्या रोगावरील रामबाण उपाय मला सापडला आहे.
पण रोज काही कार्यक्रम ठरलेले असतात. म्हणजे मी तो संध्याकाळी साडेचार-पाचच्या जवळपास कार्यक्रम रोज पाहतो. काय नाव बोलू त्या कार्यक्रमाचे? ‘थ्री इडियट’. नाही नको, ‘एक फुल दोन माली’ हे ठीक आहे. ती फुल येते. आणि ते दोन माली असतातच. नेहमी तेच असतील अस नाही. पण दोन आकडा कायम. ती फुल काय दिसते म्हणू सांगू! जाम भारी आहे. पण एकच गोष्ट खटकते. ती फुल सिगारेटचे झुरके घेत असते. त्या इमलीच्या झाडाच्या बाजूला बाईकवर ते दोन माली स्थानापन्न असतात. आणि ती हलत डुलत गप्पांचा पाक करीत असते. ड्रेसिंग सेन्सबद्दल काय सांगू. खरोखरच फॅशन टीव्ही प्रत्यक्षात उतरल्याप्रमाणे. काल तो कार्यक्रम लागलेलाच नव्हता. फार बोर झालेला टीव्ही पाहतांना. तो कार्यक्रम जरी सिगारेटयुक्त आणि फॅशन टीव्ही वरील वाटला तरी बाकी फालतू म्हणता येईल अस काही नसते.
अनेकदा त्या कावळिणीचा ग्रुप तिथे खिदळत असतो. तर कधी कावळ्यांचा कावकाव चालू. आणि कधी कधी १९४२ ची लव्ह स्टोरी. हो आजी आजोबा हातात हात घालून फिरत असतात. काय बोलू, पुण्याचे महाबळेश्वर झाल्याचा भास होतो. समोरच्या कॉफी शॉपमध्ये अनेक कबुतरे पार्टटाईम कॉफी पिण्याचा जॉब करतात. आणि खर बोलायचे झाले तर हे दूरदर्शन दुरूनच चांगले असते. जस जस जवळ आपण जायला लागतो तस् तसे ते सौंदर्य कमी होत जाऊन त्यातील खाचखळगे दिसू लागतात. रात्री देखील कार्यक्रमांचा खजिना उघडा असतो. पण एकूणच टीव्हीवरील कार्याक्रमांमुळे डोक्याचा गेलेला उत्साह पुन्हा येतो.
Leave a Reply