काय मजेदार देश आहे आपला, इथे जन्मापासून मरेपर्यंत सगळीकडे वादच वाद. ‘शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?’ याचा वाद. त्याचे गुरु कोण यावर देखील वाद. एवढे तरी बर की ‘आई’ कोण यावरून वाद नाहीत. अरे, आजचा खरा खुरा ‘शोले’ राममंदिर.. त्यावर सुद्धा वाद. देवाला सुद्धा नाही सोडले. मुंबई कोणाची? यावर सुद्धा वाद. मुळात देश ‘निधर्मी’ की ‘हिंदूराष्ट्र’ यावर सुद्धा वाद आहेच म्हणा. अरे हिंदुस्थान की भारत की इंडिया यावर देखील वाद चालूच आहे म्हणा. राष्ट्रभाषा नाही. पण त्यावरून देखील वाद. सरदार सरोवरच्या बंधाऱ्याची उंची वाढवण्यावरून वाद, कश्मीरमध्ये तर सगळेच वाद. बिचारे जम्मू आणि लडाखवाले. नक्षली उंदरावर सैन्याचा फवारा मारायचा का त्यावर देखील वाद. महिला आरक्षण द्यायचे की नाही त्यावर देखील वाद.
भोपळ दुर्घटनेचा मुख्य आरोपीला पकडायचे की नाही त्यावर सुद्धा वाद. राम होता का नव्हता यावर वाद. व्हेलेन्टाईन्स डे वर वाद. ‘मुन्नी बदनाम’ पासून ते जोधा अकबर, आणि ‘माय नेम’पासून ‘गदर’पर्यंत वाद. अमेरिकेत कोणी तरी कुराण जाळते, आणि जाळपोळ आमच्या मालेगावात. त्यावर देखील वाद. आणि ते पाहून राजकीय पक्ष एकमेकांशी वाद घालतात. सेझवर वाद. म्हाडाच्या घरकुलातही वाद. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात वाद. मराठी बोललं तरी वाद. आणि हिंदी बोललं तरी वाद. गुगलच्या अर्थवरील नकाशाचा सुद्धा वाद. ब्लॅकबेरीच्या सर्व्हरचा सुद्धा वाद. सानिया पाकिस्तानी की भारतीय यावर सुद्धा वाद. सीमाप्रश्नावर वाद. बाभळीचा सुद्धा वाद. टीम इंडिया हरली तर कोणामुळे हरली त्यावर वाद. तेलंगाणावर, विदर्भावर वाद.
गणपती उत्सवात मानापानावरून वाद. लग्नातही हुंड्यासाठी वाद. नॉनस्टॉप आठवी वर सुद्धा वाद. आणि बेस्ट फाईव्हवर सुद्धा वाद. सरकारी सुट्ट्या दिल्या तरी वाद. आणि कमी केल्या तरी वाद. पद्मभूषण कोणाला द्यावा आणि न द्यावा यावरून देखील वाद. गुजरातचे नाव काढले तर वादविवाद स्पर्धाच. मराठी माणूस कुणाचा यावर सुद्धा वाद. राज ठाकरे काही बोलला तरी वाद, नाही बोलला तरी वाद. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरावयाचे यावरून वाद. गल्लीतील चिल्लर मंडळाचा अध्यक्षपद पासून ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर वाद. सीलिंकच्या नावाचा वाद. कलमाडीने केलेली घोटाळे क्रीडावर काय निर्णय घ्यावा यावर सुद्धा वाद. अफझल गुरु महाराजांच्या फाशीच्या शिक्षेवर काय करायचे यावर देखील वाद. फाशी शिक्षा ठेवायची का नाही यावर देखील वाद.
‘समलिंगी विवाह’ कायदा सुद्धा वाद. आत्महत्या वर वाद. आणि जमिनीसाठी सुद्धा वाद. मेट्रोचा वाद आणि मोनोरेलचा सुद्धा वाद. रस्त्यांचा आणि टोलनाक्यांचा सुद्धा वाद. जातीजातीत वाद. धर्म धर्मात वाद. जातगणनेत सुद्धा वाद. निवडणुकीत वाद. अस कुठलेच क्षेत्र नाही की जिथे वाद नाही. काय वाटत आपला देश खऱ्या अर्थाने ‘वादविवादस्थान’ म्हणणे बरोबर राहिलं काय?
Leave a Reply